पवनचक्की कंपनीला टाळे
By Admin | Updated: May 26, 2015 00:54 IST2015-05-25T23:00:34+5:302015-05-26T00:54:44+5:30
‘मनसे’चे आंदोलन : शेतकऱ्यांवरील अन्यायाला विरोध

पवनचक्की कंपनीला टाळे
पाटण : शेतकऱ्यांच्या जमिनी विनापरवाना बळकावून त्यातून रस्ता काढणे, खोटे धनादेश देऊन फसवणूक करणे, शेतकऱ्यांनी परवानगी दिलेली नसताना त्यांच्या जमिनीतून अतिक्रमण करणे. या पवनचक्की कंपनीच्या त्रासाला कंटाळून हतबल झालेल्या गोकुळ तर्फ पाटण येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संदीप मोझर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणमध्ये सोमवारी आंदोलन केले. संबंधित रत्नागिरी विंड एनर्जीच्या पाटण येथील पवनचक्की कार्यालयास यावेळी टाळे ठोकण्यात आले.
पाटण तालुक्यातील गोकुळतर्फ पाटण येथील शेतकरी पवनचक्की कंपनीच्या मनमानी व जुलमी कारभाराला कंटाळले होते. पवनचक्की कंपनीच्या मनमानी व जुलमी कारभाराला कंटाळले होते. पवनचक्की टॉवर्सच्या पात्यांची व इतर साहित्यांची वाहतूक करण्यासाठी रस्त्याच्याकडेला असणारी शेतकरी जमीन बळकावून त्यातून जेसीबीच्या साह्याने रस्ते करणे, शेतकऱ्यांवर खोट्या पोलीस केसेस करून त्यांना गुन्ह्यात अडकविणे हे प्रकार सुरू आहेत. याबाबत गोकुळतर्फ पाटण येथील शेतकरी सुरेश गालपे, सीताबाई गालपे, अनसूया गालपे, राजाराम गालपे यांनी पाटणमधील चाफोली रोडवरील रत्नागिरी विंड एनर्जीच्या कार्यालयात जाऊन घोषणाबाजी करत कंपनीस टाळे ठोकले. (प्रतिनिधी)