पंतांच्या जवळीकीचा पाटणला किती फायदा?
By Admin | Updated: December 1, 2014 00:21 IST2014-11-30T21:59:08+5:302014-12-01T00:21:40+5:30
देसार्इंच्या नावाची चर्चा: पुन्हा एकदा तालुक्यात लालदिव्याची चाहूल

पंतांच्या जवळीकीचा पाटणला किती फायदा?
अरुण पवार - पाटण -- : शिवसेना शासनामध्ये सामील होणार, अशी चिन्हे दिसत असतानाच आमदार शंभूराज देसाई व मुख्यमंत्री फडणवीस यांची जवळीक अनेकांनी पाहिल्याने पुन्हा एकदा पाटणला मंत्रिपद मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कऱ्हाड विमानतळावर घेतलेली भेट चर्चेचा विषय बनली असून, यापूर्वी झालेल्या पाच मुख्यमंत्र्यांशी शंभूराज यांची जवळीक होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार शंभूराज देसाई यांची मैत्री असल्याचा प्रत्यक्ष अनुभव पाटणच्या जनतेने २००४ मध्ये घेतला आहे. शंभूराज देसाई आमदार असताना विविध ठिकाणच्या पाच आमदारांना त्यांनी पाटणमध्ये आणले होते. एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या पाच आमदारांमध्ये सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस हेही होते. नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना मरळी कारखान्यावर आले होते. त्यानंतर राणे यांचे शिवसेनेशी मतभेद झाल्यानंतर २००४ मध्ये राणे यांनी शिवसेनेचे काही आमदार माझ्या संपर्कात आहे, असे वक्तव्य केले होते. यात शंभूराज देसाई यांचा समावेश असल्याचे तर्क निघाले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी देखील शंभूराज देसार्इंची जवळीक होती. देसार्इंना मिळालेला ‘उत्कृष्ठ संसदपटू आमदार’ पुरस्कार हा मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारकिर्दीतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख व शंभूराज देसार्इंची अत्यंत जिवाभावाची सलगी होती.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त पाटणमध्ये येऊन विलासरावांनी शंभूराज देसार्इंची स्तुती करताना विधानसभेत देसार्इंची लक्षवेधी ऐकण्यासाठी मी मुद्दामहून विधानभवनात हजर राहत होतो, असे सांगितले होते.
तालुक्यासाठी मैत्रीचा उपयोग होणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार शंभूराज देसाई यांच्या जवळीकतेचा फायदा पाटण तालुक्यासाठी होईल, अशी शक्यता आहे. देसार्इंना मंत्रिपद मिळो अथवा न मिळो. मात्र, निधी खेचून आणण्यासाठी ही मैत्री फायदेशीर आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना शंभूराज देसार्इंनी त्यांच्याशी जवळीक साधून कामे करून घेण्याचा मोठा प्रयत्न केला. चव्हाणांना कारखान्यावर आणले. मात्र, त्या सरकारकडून शंभूराज यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. तरीसुद्ध मुख्यमंत्री चव्हाण ज्या-ज्यावेळी कऱ्हाडला यायचे तेव्हा शंभूराज देसाई न चुकता त्यांची भेट घ्यायचे.