उन्हाळ्याच्या तोंडावर विहिरी कोरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:18+5:302021-03-22T04:35:18+5:30
गत सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कमीकमी होत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गेल्या दीड महिन्यापासून विहिरीतील पाणीपातळी हळूहळू ...

उन्हाळ्याच्या तोंडावर विहिरी कोरड्या
गत सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कमीकमी होत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गेल्या दीड महिन्यापासून विहिरीतील पाणीपातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. तर, महिन्यापूर्वीच लहान-मोठे ओढे, नाले, बंधारे आटले असून सर्वत्र ठणठणाट आहे. नदीवरून पाणीपुरवठा करून क्षेत्र ओलिताखाली आणलेल्या लिफ्ट इरिगेशन पाणीयोजनांच्या क्षेत्रात असणा-या विहिरी ब-यापैकी पाझरत असल्याने सहा-सात तास वीजपंप चालत आहेत. त्याच भागातील मोठ्या ओढ्याला धार चालू आहे. त्याचेही पाणी कमी होऊ लागले आहे. गत सहा ते सात वर्षांपासून पाऊसकाळ कमी होत चालल्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावत चालली आहे. एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून अनेक शेतक-यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. दररोज कसाबसा एक ते दीड तासच विद्युतपंप चालत असून दोन ते तीन स-या पाणी पाजून होत आहे. पुढील महिन्यात पूर्णपणे विहिरी आटतील, अशी भीती शेतक-यांतून व्यक्त होत आहे.
सध्या अनेक शेतक-यांनी पर्यायी सोय असणा-या ठिकाणी तासावर भाडेतत्त्वावर पाणी घेतले आहे. गत चार-पाच वर्षांपासून एप्रिल, मे व पाऊस पडण्यापूर्वी जूनचे काही दिवस विहिरींची पाणीपातळी कमी होत असल्यामुळे शेतात कोणतेही पीक घेता येत नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच लहान-मोठे ओढे कोरडे पडल्याने शेतकरी वळीव पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे. चालू वर्षी मे महिना सुरू होण्यापूर्वीच विहिरी तळ गाठतील, अशी भीती आहे.
- चौकट
पिकांनी माना टाकल्या
माळरान व हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतक-यांनी उशिरा टोकण केलेले गहू, हरभरा पिके कसेबसे काढले आहे. आता ऊस पिकाला पाणी मोठ्या प्रमाणात लागत आहे. भरपूर पाणी नसल्यामुळे अनेक शेतक-यांची ऊस पिके पिवळी पडू लागली आहेत.
- कोट
चालू वर्षी एप्रिल महिन्यातच विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या विहिरींवर दोन तासच विद्युतपंप चालत आहे. पाऊस सुरू होईपर्यंत पिके जगविणे अवघड झाले आहे. वळीव पाऊस पडला तर पिके जगतील. अन्यथा, चालू वर्षी अवघड परिस्थिती आहे.
- सागर शेडगे, शेतकरी
विहे-शेडगेवाडी, ता. पाटण
फोटो : २१केआरडी०५
कॅप्शन : प्रतिकात्मक