धरणातला पाणीसाठी अडकला ‘गाळात’!
By Admin | Updated: May 30, 2016 00:44 IST2016-05-29T22:19:35+5:302016-05-30T00:44:39+5:30
पाणी साठणार तरी कसं? : क्षमतेएवढं पाणी साठतच नसल्याचं वास्तव चित्र

धरणातला पाणीसाठी अडकला ‘गाळात’!
सागर गुजर -- सातारा साताऱ्यासह सांगली जिल्ह्याचे शेतीक्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या जिल्ह्यातील धरणांतील गाळ हा मोठा प्रश्न सध्या आ वासून उभा आहे. जिल्ह्यामध्ये जलसिंचनाचे तब्बल ३१ लहान-मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांनी सलग दोन वर्षे पडलेल्या दुष्काळाशी लढण्याचे बळ लोकांना दिले; परंतु यापैकी बहुतांश प्रकल्पांमध्ये गाळाचे साम्राज्य साठले असल्याने येत्या पावसाळ्यात जरी चांगला पाऊस झाला, तरी पाणी साठविण्यावर मर्यादा येणार आहेत.
पावसाळ्यामध्ये धरणांतील पाणीसाठ्याचे परिमाण जलसंपदा खात्याकडे असते; परंतु वास्तवात धरणांत साठलेल्या गाळामुळे क्षमतेइतकेही पाणी धरणांमध्ये साठू शकत नाही, हे वास्तव चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरण प्रकल्पांतील गाळच काढला जात नसल्याने वर्षानुवर्षे गाळाचे प्रमाण वाढतच चालले आहे. साहजिकच गाळामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पाऊस कितीही झाला तरी एका मर्यादेच्या पलीकडे पाणी साठवता येत नसल्याने धरणांतील पाणी नदीत सोडून दिले जाते.
पावसाळ्यामध्ये धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी उपलब्ध होते, ती या साठलेल्या गाळासकट असते. गाळ वगळून पाण्याची मोजदाद निश्चितच कमी भरते. गळती झालेल्या कालव्यांमुळे पाणी वाया जाते, हे डोळ्याने दिसणारे चित्र आहे; परंतु धरणांच्या पोटात साठलेल्या गाळाला जलसंपदा खाते कोणता ‘मायक्रोस्कोप’ लावणार आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
या साठलेल्या गाळाबाबत कोणी चकार शब्द काढायला तयार नाही. गाळ काढल्यास मोठा पाणीसाठा निर्माण होऊ शकतो.
प्रकल्पनिहाय क्षमता व उद्देश
उरमोडी-परळी जवळच्या या धरणाची ९.९६ टीएमसी इतकी पाणी साठविण्याची क्षमता आहे. या धरणाद्वारे सातारा, खटाव, माण तालुक्यांतील एकूण २७ हजार ७५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
धोम-बलकवडी या धरणाची ४.०८ टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता आहे. भोर, खंडाळा, फलटण तालुक्यांती १८ हजार १०० हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली येणार आहे.
तारळी-पाटण तालुक्यांतील डांगिष्टेवाडी येथील या धरणाची ५.९५ टीएमसी इतकी आहे. या धरणाद्वारे सातारा, खटाव, माण, पाटण, कऱ्हाड तालुक्यांतील १४ हजार २७३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणायचे आहे.
महू-हातगेघर - कुडाळी नदीवरील या धरणाची क्षमता ०.२६ टीएमसी इतकी असणार आहे; या धरणाद्वारे जावळी तालुक्यातील ५ हजार ३२७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावयाचे असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या धरणाचे काम रखडलेले आहे.
मोरणा-गुरेघर- पाटण तालुक्यातील मोरणा नदीवर गुरेघर गावाजवळ १.३९६ क्षमतेचे हे धरण असून, याद्वारे पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील ३ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावयाचे आहे.