शिरवळ: एकीकडे ऐतिहासिक असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ महाराजांच्या पालखीची व वारीतील पादुकांना पहिल्या स्नानाची आतुरता शिगेला पोहोचली असताना नीरा नदीमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून तैनात केलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिम,शिरवळ रेस्क्यू टिम तसेच एनडीआरएफच्या जवानांच्या सतर्कतेने व प्रसंगावधानामुळे नीरा नदीमध्ये पादुकांच्या स्नानापूर्वी व स्नान पार पडल्यानंतर पोहोण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
आळंदी ते पंढरपूर वारी करिता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवार दि.२६ जून रोजी पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात पाडेगाव याठिकाणी टाळ मृदंगाच्या व माऊली...माऊली च्या जयघोषात फुलांच्या वर्षावात आगमन झाले.यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होत असताना समस्त वारक-यांचे डोळे हे नीरा नदीवर पाडेगाव येथील श्री दत्त मंदिर परिसरात असणा-या घाटावर माऊलींच्या पादुकांना पहिल्या शाही स्नानाच्या सोहळ्याकडे लागत असतात.
त्यानुसार सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील,सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी,अपर जिल्हाधिकारी नागेश पाटील,अपर पोलीस अधिक्षक डॉ.वैशाली कंडुकर,वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या निर्देशानुसार खंडाळा तहसीलदार अजित पाटील,सातारा जिल्हाधिकारी आपत्कालीन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा नदीवर दरवर्षीप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिम,शिरवळ रेस्क्यू टिम तसेच एनडीआरएफच्या जवानांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.
त्यानुसार वारीमधील गर्दी पाहता सातारा जिल्हा प्रशासनाकडून बुधवार दि.२५जून रोजी संबंधित टिम ह्या पाडेगाव याठिकाणी तैनात करण्यात आल्या.यावेळी वीर धरण प्रशासनाकडून पावसाचे प्रमाण पाहता मोठ्या प्रमाणात वीर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नीरा नदीपात्रात पाण्याचे प्रमाण वाढले होते.त्यादृष्टीने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सातारा जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.दरम्यान,महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिम,शिरवळ रेस्क्यू टिम तसेच एनडीआरएफच्या जवान हे माऊलींच्या पादुकांचे शाही स्नानाच्या पार्श्वभूमीवर नीरा नदीमध्ये अंघोळीसाठी वारकरी बांधवांना सतर्क करीत असताना अतिउत्साहात पोहोण्यासाठी उतरलेल्या एक युवक पोहोताना दम लागल्याने बुडत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी संबंधित टिमच्या सतर्कतेने युवकाला वाचवित नदीकाठी सोडल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांनंतर आणखी एक युवक नीरा नदीमध्ये बुडत असल्याचे दिसताच त्याचाही जीव वाचविण्यात यश आले.यादरम्यान,माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांना भक्तिभावाने शाही स्नान घातल्यानंतर घाटावरील गर्दी कमी झाल्यानंतर आणखी एक युवक हा नीरा नदीमध्ये पोहोण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने व दम लागल्याने पाण्याच्या मध्यभागी बुडत असल्याचे निदर्शनास येताच महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिम,शिरवळ रेस्क्यू टिम तसेच एनडीआरएफच्या जवानांच्या सतर्कतेने संबंधीत युवकाचा जीव वाचविण्यात यश आले.यावेळी माऊलींच्या पादुकांच्या स्नानादरम्यान महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिम,शिरवळ रेस्क्यू टिम तसेच एनडीआरएफच्या जवानांच्या सतर्कतेने नीरा नदीमध्ये बुडणाऱ्या तीन युवकांना जीवनदान दिल्याने पालखी सोहळा पदाधिकारी व सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने कौतुक करण्यात आले.
सातारा जिल्हा प्रशासनामुळे वारकरी सुरक्षित..अनर्थ टळला..!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात अली आहे.दरम्यान,नीरा नदीमध्ये होणाऱ्या माऊलींच्या पादुकांच्या पार्श्वभूमीवर वीर धरण प्रशासनाकडून वाढत्या पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन नीरा नदी पात्रात जवळपास ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या व विश्रांतीसाठी पाडेगाव येथील श्री दत्त मंदिरामध्ये थांबलेले वारकरी नीरा नदीचे पाण्याने श्री दत्त मंदिराला वेढल्याने वारकरी अडकले गेले होते.
यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील,पोलीस अधिक्षक तुषार दोषी,प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस,खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुका प्रशासन,पाडेगाव ग्रामस्थ,लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी,कर्मचारी यांनी मोहीम राबवित वारकरी बांधवांना पाण्यातून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी नेत जीव वाचवित कर्तव्य बजावले.यावेळी पोलीस प्रशासनासहित महसूल प्रशासन,पाडेगाव ग्रामस्थ यांनी दाखविलेल्या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.