भुयारी गटारचे खड्डे भर पावसात भरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST2021-06-17T04:27:01+5:302021-06-17T04:27:01+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने शहरात गेल्या दीड वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत हे काम जवळपास ...

भुयारी गटारचे खड्डे भर पावसात भरले!
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने शहरात गेल्या दीड वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत हे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, खोदकामामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने खडीकरण व डांबरीकरण करणे क्रमप्राप्त होते. मात्र, भर पावसात खडीकरणाचे काम हाती घेतल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
कास धरणाची उंची, ग्रेड सेपरेटर व भुयारी गटार ही सातारा पालिकेची महत्त्वाकांक्षी कामे आहेत. ग्रेड सेपरेटर सातारकांच्या सेवेत दाखल झाला असून, कास धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. या तुलनेत शहरात सुरू असलेले भुयारी गटार योजनेचे काम मात्र अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. शासनाकडून या योजनेच्या पूर्णत्वासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांचा कामाचा वेग पाहता आतापर्यंत केवळ पन्नास टक्केच काम पूर्ण झाले आहे.
भुयारी गटार योजनेचा विषय आजवर नेहमीच चर्चेचा ठरला आहे. नागरिकांना कामाचा फायदा कमी अन् तोटाच अधिक होत असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला होता. या कामाच्या दर्जाबाबतही सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्या शहराच्या पश्चिमेकडील मंगळवार पेठ, यादोगोपाळ पेठ परिसरात भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली. नागरिक तसेच वाहनधारकांना निर्माण होणाऱ्या अडचणींची दखल घेत पालिकेने नुकतेच येथील खड्डे खडी टाकून मुजविले आहेत. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने आता डांबरीकरणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सातारकरांना भविष्यात सुखकर ठरणारा हा प्रकल्प अधिक वेगाने व दर्जेदार होणे गरजेचे आहे.
(चौकट)
काय आहे भुयारी गटार योजना ?
सातारा शहराचे सांडपाणी भूमिगत मार्गाने शहराबाहेर नेण्याचा ५० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्ताधारी सातारा विकास आघाडीने राबविला आहे. भूमिगत मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. शहरातील सर्व सांडपाण्यावर या प्रकल्पात प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.
(कोट)
भुयारी गटार प्रकल्पाचे काम वेळेत मार्गी लागणे गरजेचे आहे. खोदकामामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. पालिका प्रशासनाने आता खडी टाकून हे खड्डे मुजविले आहेत. माॅन्सून पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वी खडीकरण व डांबरीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक समस्या उद्भवतील.
- विजय काटवटे, नगरसेवक (भाजप)
(कोट)
भुयारी गटार योजना सातारकरांसाठी सुखकर असली तरी हे काम दर्जेदार व वेळेत होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. खोदकाम झाल्यानंतर रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. पालिका प्रशासाने योग्य नियोजन करून हे काम मार्गी लावले तर नागरिकांच्या अडचणी कमी होतील.
- वसंत लेवे, नगरसेवक (साविआ)
फोटो : १६ जावदे ०१
सातारा शहरातील रस्त्यांची भुयारी गटार योजनेसाठी केलेल्या खोदकामामुळे दुरवस्था झाली आहे. पालिकेने भर पावसात हे खड्डे खडी टाकून मुजविले असले तरी वाहनधारकांची कसरत काही थांबलेली नाही. (छाया : जावेद खान)