तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:18+5:302021-02-25T04:53:18+5:30
मायणी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील यात्रा, उत्सव व जत्रांवर शासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात येत ...

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ
मायणी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील यात्रा, उत्सव व जत्रांवर शासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात येत आहेत. त्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने या कलाकारांना व कलावंतांना आर्थिक मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दीपावलीनंतर ग्रामीण व शहरी भागातील अनेक यात्रा, जत्रा व उत्सव प्रतिवर्षी होत असतात. ग्रामीण भागामध्ये लोकांची करमणूक करण्यासाठी विविध धार्मिक, सामाजिक क्षेत्रांत कार्य करीत असलेल्या विविध संघटनांकडून लोकनाट्य, तमाशा दाखविण्यात येतात. या लोककलेची महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असते. महाराष्ट्रात शेकडो लोकनाट्य तमाशा मंडळे आहेत. यामध्ये हजारो कलाकार काम करीत आहेत. तसेच या लोकनाट्य तमाशा मंडळांमध्ये अनेकांना रोजगाराची संधी मिळालेली असते.
मात्र, गतवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनामार्फत विविध निर्बंध लादण्यात आले. तसेच सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे ग्रामीण भागातील यात्रा, उत्सवही बंद राहिले होते. त्यामुळे संपूर्ण वर्ष या लोककलावंतांनी घरातच बसून काढले. हाताला कोणतेही काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.
यावर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाने यात्रा, उत्सव व जत्रा भरवण्यास परवानगी दिली. त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडे-थोडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पंधरा दिवसांच्या आतच या उत्सवावर शासनाने पुन्हा बंदी घातल्यामुळे या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने यांना आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.
(चौकट )
सांगा पैसे कोठून आणायचे ?
आपल्या कलावंत व कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी यात्रा, उत्सव चालू होतील. या आशेवर मिळेल तिथून आर्थिक फंड गोळा केला होता. तसेच खासगी सावकारांकडूनही आर्थिक मदत कर्जरुपाने घेतली. मात्र, संपूर्ण वर्षात कार्यक्रम न झाल्याने हे पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
(कोट..)
आमच्या मंडळामध्ये एकूण ३५ कलाकार आहेत. यातून २५ कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. या कुटुंबांमध्ये शंभराहून अधिक सदस्य आहेत. मात्र, गतवर्षीपासून यात्रा, उत्सव, जत्रा यावर बंदी आल्याने या संपूर्ण कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने मदत करण्याची गरज आहे.
-प्रशांत वन्ने-पडळकर,
तमाशा मंडळ मालक,