तारळी धरणाला वर्षात गळती!
By Admin | Updated: November 28, 2014 00:09 IST2014-11-27T21:33:18+5:302014-11-28T00:09:38+5:30
कोट्यवधी रुपये पाण्यात : वर्षापूर्वी लोकार्पण झालेल्या धरणाच्या कामाविषयी संभ्रमावस्था

तारळी धरणाला वर्षात गळती!
एकनाथ माळी - तारळे -वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करून लोकार्पण केलेल्या तारळी धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे धरणाच्या कामाविषयी तर्कविर्तक लढविले जात आहेत. दरम्यान, सिंचन घोटाळ्याची चर्चा सुरू होताच, कमकुवत धरणांच्या यादीत तारळीचाही समावेश होता. त्यावेळी झालेल्या आरोपांना पुष्टी देणारी ही घटना आहे.
मुरुड गावच्या पश्चिमेला १९९८ मध्ये हजारो लोकांचे पुनर्वसन करून तारळी धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. धरणाचे काम पूर्ण होण्यास २०१३ हे वर्ष उजडावे लागले. धरणात ५.८५ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरणग्रस्थांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आजही अधांतर आहे. परराज्यातील ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने काम केले. कामाचा दर्जा ढासळल्यानेच धरणात एक वर्षांत गळती लागल्याचे सांगितले जात आहे.
तारळी धरणावरून, बाजूने किंवा भिंतीजवळ जाऊन बघितल्यास धरणाच्या गळतीचे भयावह दृश्य पाहण्यास मिळते. धरणाच्या डाव्या बाजूला पडणाऱ्या प्रवाहाशेजारी तळातून, गॅलरीतून व इतर ठिकाणी तसेच धरणाच्या इतर उजव्या बाजूला गळती दिसून येत आहे. उजव्या बाजूच्या गॅलरीतून वाहणारे पाणी तोंडोशी बाजूने रस्त्याकडेने वाहत आहे. गळती झालेले पाणी नदीस मिळून अंदाजे एक टीएमसीच्या आसपास असल्याची माहिती पर्यटकांमधून सांगितले जात आहे.
धरणाला लागलेली गळती काढण्यासाठी काढण्यासाठी कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच हालचाल न केल्याने त्यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. गळतीबाबत अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांला माहिती देऊनही दखल घेतली जात नाही.
धरणाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना गळती काढण्यासाठी रीतसर सूचना दिल्या आहेत. पावसामुळे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू होईल. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना अंतिम बिले दिली नाहीत.
- एस. आर. पाटील,
अभियंता