माउलींच्या पदस्पर्शानं सुखावली लोणंदनगरी
By Admin | Updated: July 6, 2016 00:28 IST2016-07-05T23:31:11+5:302016-07-06T00:28:35+5:30
लाखोंची हजेरी : सहस्त्र जलधारांनी वरुणराजाकडून स्वागत

माउलींच्या पदस्पर्शानं सुखावली लोणंदनगरी
लोणंद :
सावळे सुंदर रूप मनोहर।
राहो निरंतर हृदयीं माझे।।
आणिक काहीं इच्छा नाहीं आम्हा चाड।
तुझें नाम गोड पांडुरंगा।।
टाळ-मृदंगाच्या तालावर विठूनामाचा गजर करीत मंगळवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल झाला. नीरा नदीत पादुकांना स्नान घातल्यानंतर नीरा ते लोणंद पायी वारीने पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला अन् माउलींच्या पदस्पर्शानं अवघी लोणंदनगरी सुखावून गेली. वरुणराजानेही सहस्यजलधारांनी माउलींचे स्वागत केले.
पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर लोणंदमध्ये नगरपंचायतीसमोर आला. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, नगरसेवक हणमंत शेळके, सचिन शेळके, हेमलता कर्णवीर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, कुसूम शिरतोडे, दशरथ जाधव, योगेश क्षीरसागर, दिपाली क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, हर्षवर्धन शेळके, तारीख बागवान, सर्फराज बागवान उपस्थित होते.
गावातील प्रमुख मार्गावरून पालखी तळावर नेण्यात आली. यावेळी लोणंदकरांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाचला पालखी तळावर पोहोचली.
दिंड्यांतील सर्व वारकऱ्यांनी गोलाकार करुन त्यामध्ये पालखी नाचवत हरिनामाचा गजर केला. त्यानंतर चोपदारांनी राजदंड उंचावताच सर्व शांत झाले. यावेळी दिंडीप्रमुख व दिंड्यांना सूचना करण्यात आल्या. भजन, कीर्तन आणि भारुडामध्ये लोणंदनगरी दंग झाली होती. (वार्ताहर)