प्रशासकीय मंजुरीची कामे थांबवा
By Admin | Updated: January 13, 2015 00:05 IST2015-01-12T22:33:42+5:302015-01-13T00:05:19+5:30
पालकमंत्र्यांची सूचना : नवीन कामांची टेंडरप्रक्रिया थांबवा; अन्यथा ओढवणाऱ्या प्रसंगाला सामोरे जा

प्रशासकीय मंजुरीची कामे थांबवा
सातारा : ‘जिल्ह्यामध्ये जी प्राथमिकतेची कामे आहेत, ती पूर्ण करा. केवळ प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, अशी कामे तत्काळ थांबवा, अन्यथा कोणतीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाच त्याला तोंड द्यावे लागेल,’ असा इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सोमवारी नियोजन भवनात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिला. आघाडी शासनाने जाता-जाता अनेक कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ठेवली आहे. यापैकी अनेक कामे अनावश्यक आहे. जिल्ह्यात अनेक गावे अशी आहे की, जिथे मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. अशा ठिकाणी कामे होणे गरजेचे आहे. पूर्वी मंजूर कामे थांबविण्यात कोणतेही राजकारण नाही. त्यामुळे नवीन कामांची टेंडरप्रक्रिया राबवू नका. त्यातूनही कामे केल्यास ओढवणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायची तयारी ठेवा, असेही शिवतारे म्हणाले. जिल्हा नियोजन मंडळाकडून होणारी कामे तसेच साकव पुलाची कामे ही गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांचा दर्जा टिकून राहावा, यासाठी ती कामे बांधकाम विभागामार्फतच करायला हवीत. असेही त्यांनी सांगितले. जिहे-कठापूर योजनेबाबत पे्रझेंटेशन सुरू असताना गमतीदार प्रकार समोर आला. यासाठी तीन पंप हाऊस आहेत, यापैकी पहिल्या पंपाचं काम अपूर्ण आहे; परंतु पुढच्या दोन पंपांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या कामात ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ असाच प्रकार असल्याची टिप्पणी पालकमंत्र्यांनी केली. (प्रतिनिधी) अन् येळगावकरांची एंट्री झाली नियोजन भवनात सुरू असलेली बैठक मध्यावर आली होती. अन् त्याचवेळी नियोजन भवनाच्या बाहेर गोंधळाचा आवाज येऊ लागला. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार या इमारतीचे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. गोंधळ जास्तच वाढल्याने डोअर किपरने दार उघडले तर येळगावकर तडक आत शिरले. त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्तेही होते. पालकमंत्र्यांचा सत्कार करून ते निघूनही गेले. मेडिकल कॉलेजचा विषय मार्गी लावणार शहरात मेडिकल कॉलेज व पाचशे बेडचे हॉस्पिटल तयार करण्याची गरज असून, तसा प्रस्ताव शासन दरबारी पाठविल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाचे गांभीर्य पालकमंत्र्यांसमोर मांडले. त्यावर या विषयात लक्ष घालून तो मार्गी लावू, असेही पालकमंत्री म्हणाले. खंबाटकीतले तीव्र वळण काढणार पुणे-बेंगलोर महामार्गावर खंबाटकी येथे बोगद्याच्या पुढे असणारे तीव्र वळण काढून टाकणे गरजेचे आहे. हे काम लवकरच केले जाईल. तसेच खंबाटकी घाटात वाहनांची कोंडी होत असल्याने नवीन बोगदा तयार करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची सुगी पंधरा वर्षांच्या वनवासानंतर भाजप-शिवसेनेचे शासन सत्तेवर आलेले आहे. मधल्या काळात दुर्लक्षेचे दुखणे सोसणारे कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या बैठकीला हजर राहिले होते. काही जण तर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कानात काही सूचनाही करताना पाहायला मिळाले. जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार व महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनीही काही मुद्दे बैठकीत उपस्थित केले. बावळेकर तर पालकमंत्र्यांच्या वाहनात बसून गेले. नियोजन भवनात बैठक असल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेहमी दिसायचे. हे चित्र आज बदलल्याचे दिसले. शासकीय रुग्णालयांची विश्वासार्हता वाढवा शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. या रुग्णालयांची विश्वासार्हता वाढविल्यास गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल. त्यामुळे सिझरसह सर्व उपाययोजना ग्रामीण रुग्णालयातही झाल्या पाहिजेत. येत्या १२ फेब्रुवारीला शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीची संख्या वाढायला पाहिजे. मी यावेळी स्वत: जिल्ह्यातील रुग्णालयांना भेटी देणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले. रखडलेल्या प्रकल्पांसाठी तीन दिवस जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. स्थानिक आमदारांनाही सोबत घेणार आहे. जिहे-कठापूरला २६ जानेवारी रोजी तर वसना-वांगना व इतर प्रकल्पांना त्यानंतरच्या दोन दिवसांत भेट देऊन पाहणी करून निर्णय घेणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.