कऱ्हाडातील चौक वडापने घेरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:18+5:302021-08-28T04:43:18+5:30
कऱ्हाड : येथील बसस्थानक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्या जात आहेत. तेथे वाहतूक पोलीस ...

कऱ्हाडातील चौक वडापने घेरले!
कऱ्हाड : येथील बसस्थानक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्या जात आहेत. तेथे वाहतूक पोलीस तैनात असतानाही रिक्षा अस्ताव्यस्त लावल्या जात असून, वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सध्या शहरातील चौक वडापने घेरल्याचे दिसत आहे.
शहरातील कर्मवीर चौक, दत्त चौकासह भेदा चौकात काही रिक्षा चालकांकडून रिक्षा मुद्दाम आडव्या लावल्या जात आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी विचारणा केली तर त्यांना उलट उत्तरे दिली जात आहेत. पालिका, पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बसस्थानक परिसरात बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कारवाईचा दंडुका हाती घेणे गरजेचे आहे. बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेकदा प्रवासी ये-जा करण्यासाठी रिक्षांचा वापर करतात. मात्र, स्वत:च्या वाहनाने, दुचाकीने बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अशा विविध मार्गांनी येणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकात जाण्यासाठी दररोज अस्ताव्यस्त उभ्या होणाऱ्या रिक्षांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याच्या परिसरातील रिक्षा व्यावसायिकांचाही उद्योग अशाच प्रकारे चालला आहे.
मलकापूर परिसरात जाणाऱ्या रिक्षा तर त्यांचा थांबा सोडून रस्त्यावरच प्रवाशांना घेतात. त्याचबरोबर पुतळ्यासमोर असलेल्या रिक्षा थांब्यावर अनेकदा रिक्षांच्या दोन-दोन रांगा केल्या जातात. तेथेच सिग्नलही असल्याने या सर्व रिक्षांचा अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- चौकट
वाहतूक पोलिसांसमोर मनमानी
वाहतूक पोलिसांसमोरच हा प्रकार घडत असताना त्यांच्याकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता बसस्थानकाबाहेरील बिघडलेल्या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिका, पोलीस आणि आरटीओ यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.
- चौकट
पादचारी मार्गालगत यांचीच सत्ता
कऱ्हाड शहरातील बसस्थानक परिसरातील पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. अनेक व्यावसायिकांनी पादचारी मार्गावरच आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यातच फूटपाथला घासून वडापची वाहने उभी केली जात असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.
फोटो : २७केआरडी०३
कॅप्शन : जिजामातानगर - विमानतळ, ता. कऱ्हाड येथे जिजामाता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.