सातारा : कोयना धरणात ८६ टीएमसी पाणीसाठा, पश्चिम भागात पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:02 IST2018-08-01T15:59:47+5:302018-08-01T16:02:02+5:30
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात आवक कमी प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात ८६.२० टीएमसी पाणीसाठा असून पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सातारा : कोयना धरणात ८६ टीएमसी पाणीसाठा, पश्चिम भागात पावसाची विश्रांती
सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात आवक कमी प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात ८६.२० टीएमसी पाणीसाठा असून पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस पडत होता. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. तर कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम, बलकवडी आदी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. सध्या पाऊस थांबला असल्याने कोयना धरणातील पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे फक्त ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात ५०४२ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. बलकवडी धरणात १३८, कण्हेर ३२४, उरमोडी ५६७, तारळी धरणात ८२० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर कण्हेरमधून ५२४, बलकवडी ३१४, उरमोडी ४०० आणि तारळी धरणातून ८२० क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला.