मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठ्ठं !
By Admin | Updated: June 6, 2016 00:44 IST2016-06-05T23:31:06+5:302016-06-06T00:44:56+5:30
सातारकरांच्या मदतीला पोलिस अधिकारी धावले...

मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठ्ठं !
सातारा : रविवारचा दिवस सातारा जिल्ह्यासाठी घातवार ठरला. सकाळी उठल्या-उठल्या सातारकरांना पनवेलच्या अपघाताची बातमी समजली, तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. ‘सतरा ठार’मध्ये आपलं कोण आहे का, याचा शोध घेण्यासाठी प्रत्येकजण एकमेकांना फोन करु लागला. दिवसभरात एकेकाची माहिती मिळत गेली. रात्री नऊ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मृत्युमुखींपैकी तब्बल १४ जण जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं. एकाच गावातील चौघेजण मरण पावलेल्या सोनवडीत मात्र मृतदेह येण्यापूर्वी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती, कारण संध्याकाळचा पाऊस अंत्यविधीसाठी अडथळा तयार करु शकत होता. म्हणूनच की काय... परळी खोऱ्यात मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठं ठरल होतं.
१५ दिवसांपूर्वी नातीचं बारसं झालेलं...
अपघातात मृत्युमुखी पडलेली तीन महिन्यांची अनन्या हिचे बारसे १५ दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात गावामध्ये झाले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर मंडळी पुन्हा मुंबईला निघाली होती. मात्र, पहाटेच्या भीषण अपघातात तिचाही दुर्देवी मृत्यू झाल्याचे कळताच अवघा गाव हळहळला..
वडील मात्र अनभिज्ञच..
मूळचे सोनवडी गावातच राहणारे प्राध्यापक अविनाश हणमंत कारंडे (वय ३५) हे सुद्धा अपघातात मृत्युमुखी पडले. ते मुंबइला ‘एमडी’ कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते दोन दिवस सुटी असल्याने गावी आले होते. त्यांच्या वडिलांना पॅरालिसीस असल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत बातमीही पोहोचविली नाही. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
शेवटच्या ट्रीपनंतर सोडणार होते नोकरी
इकबाल शेख हे गेल्या तीस वर्षांपासून लक्झरी बसवर चालक म्हणून काम करत होते. काही महिन्यांपूर्वीच मालकाने नवीन लक्झरी बस खरेदी केल्याने ते कामावर जात होते. कायमस्वरूपी नोकरी सोडण्याची त्यांची इच्छा होती. तसं घरातल्यांना त्यांनी बोलूनही दाखविले होते. ‘मुंबईला शेवटची ट्रीप मारल्यानंतर मी नोकरी सोडतो,’असेही ते बोलले होते. मात्र नोकरी सोडण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला
सातारकरांच्या मदतीला पोलिस अधिकारी धावले...
विश्वास पांढरे-पाटील यांची घटनास्थळी धावपळ
सुटी संपवून ते निघाले होते गावी
संदीप शिवणकर हे मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीयांसमवेत गावी आले होते. सुटी संपल्याने ते मुंबईला निघाले होते. त्यांच्या निधनाने प्रभुचीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
श्रद्धा आली होती सुटीला महाबळेश्वरला
श्रद्धा काळे ही मूळची महाबळेश्वरची. ती मुंबई येथे महाविद्यालयात शिकत होती. कॉलेजला सुटी लागल्याने ती महाबळेश्वरला आली होती. सुटी संपल्यानंतर तीही सातारमधील नातेवाइकांसोबत मुंबईला निघाली होती. मात्र मुंबईला पोहोचण्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या मृत्यूची बातमी महाबळेश्वरमध्ये पसरताच अनेकांनी तिच्या घराकडे धाव घेतली.
साताऱ्यातील त्यांचा शेवटचा कार्यक्रम !
पद्मा बलदवा यांचे माहेर सातारा आहे. दोन दिवसांपूर्वी त्या साताऱ्यात आल्या होत्या. शहरातील एका शाळेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर त्या मुंबईला निघाल्या होत्या. मात्र काळाने त्यांच्यावरही घाला घातला.
अख्खा दिवस मृतदेहांची वाट पाहण्यात..
परळी खोऱ्यातील सोनवडी येथील शिवाजी कदम यांच्या घरातील सर्वच पुरूष मिलिटरीत. शिवाजीही निवृत्तीनंतर मुंबईत नोकरीला लागले. त्यांचे धाकटे बंधूसुद्धा मिलिटरीनंतर सध्या गावात असतात. शिवाजी आपली पत्न, सून अन् नातीला घेऊन सोनवडीत उन्हाळी सुटी व गावची यात्रा यानिमित्त आले होते. या सर्वांनी एक महिन्याची सुटी गावातच मजेत घालवली. शनिवारी (दि. ४ ) रोजी रात्री मुंबईला जायचे त्यांनी ठरविले. दुपारपासूनच बॅग भरून तयारी केली. रात्री ८ च्या दरम्यान घरातल्यांसोबत एकत्र जेवण केले. त्यानंतर ते, त्यांची पत्नी, सून व नात हे चौघेजण रात्री सातारा बसस्थानक परिसरातून खासगी बसने मुंबईला जायला निघाले. पहाटे भाऊ तानाजी कदम यांना ही घटना समजताच गावभर शोककळा पसरली. संपूर्ण गाव दिवसभर मृतदेहांची वाट पाहत बसले होते.