कऱ्हाडला शनिवार पेठेतील घरांमध्ये पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST2021-06-18T04:26:54+5:302021-06-18T04:26:54+5:30
कऱ्हाड : शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर शनिवार पेठ येथील पी. डी. पाटील उद्यान परिसरात पावसाळी वाहिन्या, नाले ...

कऱ्हाडला शनिवार पेठेतील घरांमध्ये पावसाचे पाणी
कऱ्हाड : शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर शनिवार पेठ येथील पी. डी. पाटील उद्यान परिसरात पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून भरले. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्यप्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. यावर तत्काळ उपाययोजना व्हाव्यात, यासाठी येथील नागरिकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदन दिले आहे.
पावसाळा सुरू होताच शहरातील पी. डी. पाटील उद्यान व यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह परिसरात ठिकठिकाणी नाले तुंबण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर येथील कॉलनीतील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. काही घरांमध्ये गुडघ्याइतके पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागले. मलमिश्रीत पाणी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसरात तीन रुग्णालये आहेत. येथेही रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागात नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित झाली नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहाच्या समोरील बाजूला प्लॉट नंबर ४६३ व ४६४मधील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे तारांबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. मलकापूर हद्दीतून बैल बाजार परिसरात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह परिसराकडे येत आहे. नगरपालिका प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे.