वांगी, फ्लॉवर, काकडीचे दर गडगडले
By Admin | Updated: July 17, 2014 23:18 IST2014-07-17T23:16:39+5:302014-07-17T23:18:23+5:30
गृहिणींचा जीव भांड्यात : भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात

वांगी, फ्लॉवर, काकडीचे दर गडगडले
सातारा : गेल्या काही दिवसांत साठी ओलांडलेल्या भाज्यांचे दर अखेर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. गत सप्ताहाच्या तुलनेत या आठवड्यात वांगी, फ्लॉवर व काकडीच्या दराने नीचांक पातळी गाठली आहे. तर आले, गवारी आणि टोमॅटो अद्यापही तेजीतच आहेत.
पावसाने ओढ दिल्याचा परिणाम म्हणून गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांचे दर चांगलेच तेजीत होते. गत महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. मुलांच्या आणि पतीच्या डब्याला केवळ सुक्की भाजी देऊन गृहिणींनी काही दिवस
ढकलले.
पण, एकाच भाजीची सवय नसलेल्यांच्या हे पचनी पडले नाही. रोज आज काही तरी वेगळं कर याचा नारा ऐकून गृहिणी हैराण झाल्या होत्या. मंडईत जाऊन भाजी आणायची म्हटली तर शंभर-दोनशे रुपये खर्च करून अर्धी पिशवीही भाजी येत नव्हती, अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भाज्यांची आवक कमी आणि पैशांची जावक जास्त अशी अवस्था झाली होती.
गत सप्ताहापासून जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस नव्या पिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी शेतातून मोठ्या प्रमाणावर भाजी काढत असल्यामुळे या सप्ताहात भाज्यांची आवक समाधानकारक वाढली आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांच्या वाढत्या दराचा धसका घेऊन सध्या मंडईमध्ये सामसूम आहे. दर कमी होऊनही ग्राहकांअभावी मंडई ओस पडली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी भाजी मंडईत येऊन खरेदी करावी, अशी इच्छा व्यापारी व्यक्त करत आहेत. भविष्यातही हे दर असेच कमी राहावेत आणि भाज्या खाण्याचा आनंद घेता यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
वांगी-१००-१५०४०-८०
टोमॅटो-२००-३००१००-३५०
कोबी-१००-१३०१००-१२०
फ्लॉवर- १५०-२००८०-२००
दोडका-२५०-३००२५०-३००
कारली-२५०-३००----
कांदा-२००-२६०१७०-२५०
बटाटा-१८०-२१०१८०-२००
लसूण-२००-४००२००-४५०
आले४००-६२०४००-६५०
मिरची४५०-५००२५०-३००
ढब्बू२००-२५०१००-२००
दुधी६०-१००५०-१००
भेंडी१५०-२५०१५०-३००
गवारी२००-२७०२००-२८०
काकडी१५०-२००४०-६०
शेवगा५००-६००३००-३५०
पावटा२००-२५०१५०-२००
वाल घेवडा३००-३७० २००-२५०
भुईमूग ओली२५०-३०० २००-२६०
मेथी६००-८००६००-७००
कोथिंबीर५००-७००३००-५००
आवक नाही पालक, चाकवत
भाज्यांचे दर आवाक्यात आल्यामुळे खरंच जीव भांड्यात पडला आहे. गेले काही दिवस एका वेळी एकच भाजी करत होतो. आता पुन्हा एकदा ताट भरून जेवण बघून आनंद झाला. टोमॅटोचे दरही थोडे उतरणे आवश्यक आहे.
- विद्या पवार, गृहिणी
गत सप्ताहात हिरवी मिरची खूपच चढ्या दराने विकली गेली. या सप्ताहात तिचा दर निम्म्याने खाली आला. मिरचीच्या दरातील ही उच्चांकी घसरण ठरली. मात्र, आवक अधिक आणि विक्री कमी यामुळे मिरची खराब झाली. ही खराब झालेली मिरची व्यापाऱ्यांनी आज अक्षरश: रस्त्यावर टाकली होती.