मंडईत कांद्याचा दर वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:28+5:302021-02-25T04:53:28+5:30

सातारा : कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने भाजी मंडईतही दर वाढू लागले आहेत. चांगला कांदा ६० रुपये किलोने ...

The price of onion started rising in the market | मंडईत कांद्याचा दर वाढू लागला

मंडईत कांद्याचा दर वाढू लागला

सातारा : कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने भाजी मंडईतही दर वाढू लागले आहेत. चांगला कांदा ६० रुपये किलोने विकला जात आहे.

मागील तीन महिन्यांपासून कांद्याचा दर टिकून आहे. सातारा शहरात तर ३० ते ४० रुपये किलोने कांदा मिळत होता. त्यातच गेल्या काही दिवसांत कांदा पुन्हा महागला. बाजार समितीतही दर चांगला मिळू लागलाय. त्यामुळे कांद्याचा भाव वाढू लागला आहे. भाजी मंडई व दुकानातही कांद्याची किरकोळ विक्री ५० ते ६० रुपये किलोने होत आहे, तर शेतकरीही ५० रुपयांनी कांदा विकत आहेत.

......................................................

साताऱ्यात प्लास्टिक पिशवीतून फळे

सातारा : सातारा शहरातील काही भाजी आणि फळे विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशवीचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टिक पिशवचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आजही साताऱ्यातील काही फळ विक्रेते प्लास्टिक पिशवीतून फळे देताना दिसून येत आहेत.

.........................................................

अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील शिरताव ते वरकुटे मलवडी या रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. सुमारे नऊ किलोमीटरच्या या अंतरात अनेक ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. त्यातच रस्ता अरुंद असल्याने समोरासमोर वाहन आल्यास खाली घ्यावे लागते. अशावेळी वाहन घसरते. अनेकवेळा दुचाकीस्वार पडण्याचीही घटना घडली आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

..................................................................

अस्वच्छतेमुळे दुर्गंधी

सातारा : सातारा शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विस्कटत असतात. कधी कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे संबंधितांनी येथील स्वच्छता वारंवार करण्याची गरज आहे.

........................................................

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. समर्थ मंदिरपासून धस कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या सुमारास भटकी कुत्री बसलेली असतात. अनेकवेळा ही कुत्री दुचाकीधारकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

..............................................

रस्त्यावरील व्हॉल्व्हचा धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे काही ठिकाणचे व्हॉल्व्ह रस्त्यावरच आहेत. त्यामुळे नागरिकांना कायम धोका आहे.

सातारा शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी शहरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणचे व्हॉल्व्ह रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये पाय पडल्यास दुखापतीचीही शक्यता आहे. तसेच शहरात नवीन येणाऱ्यांना याची कल्पनाही असत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक बनलेले आहे.

......................................................

Web Title: The price of onion started rising in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.