सातारा : पाश्चात्य देशांनी निर्यात कर वाढवल्याने खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. साताऱ्यात तर तेलाचा डबा २,१०० ते २,६०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे भाजीची फोडणी कमी झाली आहे तर डाळींचे दर स्थिर असून, कांदा आणखी स्वस्त झाला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांमधून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते. सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ५२७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची ३९५ क्विंटलची आवक झाली. या रविवारी कांद्याची आवक चांगली झाली. बाजार समितीत वांग्याला १० किलोला अवघा ८० ते १०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ६० ते ७० रुपयेे, कोबी ३० ते ५० रुपये, फ्लाॅवरला ६० ते ८० रुपये, दोडका अन् कारल्याला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. इतर पालेभाज्यांचे दरही स्थिर होते.
कलिंगडाची आवक
साताऱ्यात सध्या कलिंगड आणि द्राक्षाची आवक अधिक आहे. त्यामुळे दरात फार वाढ झालेली नाही. कलिंगड १० रुपयांपासून तर द्राक्षे ४० रुपये किलो दराने मिळत आहेत.
खाद्यतेलात वाढ कायम
खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मागील आठवड्यात १५ किलोचा सूर्यफूल तेल डबा २,५०० ते २,५५०, सोयाबीन २,१०० ते २,२०० तर शेंगदाणा तेल डबा २,४०० ते २,६००पर्यंत होता. तर एक लीटरचा शेंगदाणा तेल पाऊच १६५ ते १८०, सोयाबीन १३० ते १३५, सूर्यफूलचा पाऊच १६५ ते १७० रुपयांपर्यंत मिळत होता.
लसूण दर कमी
बाजार समितीत अनेक भाज्यांना कमी दर मिळत आहे. गवारला १० किलोला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवगा शेंगला अवघा १०० ते २००, पावटा ३०० ते ३५० आणि भेंडीला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. तर लसणाचा दर २ ते ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत होता.
कोट :
गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होत आहेत. यामुळे दिलासा मिळत असला, तरी खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत. त्यामुळे खर्चातही वाढ होत आहे.
- तेजश्री पाटील, ग्राहक
कोट
भारतात ७० टक्के खाद्यतेल आयात होते. कोरोनामुळे पाश्चात्य देशांची अर्थव्यवस्था खालावली. त्यामुळे या देशांनी निर्यात कर वाढवला आहे. परिणामी खाद्यतेलाचे दर वाढले आहेत.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
कोट
कांद्याचा दर एकदमच खाली आला आहे. त्यामुळे खर्च तरी निघेल का नाही, अशी स्थिती आहे. त्यातच इतर भाज्यांचेही दर कमी झाले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.
- परशुराम काटे, शेतकरी
.....................................................................................