प्रतापगड कामगारांचा आत्मदहनाचा इशारा
By Admin | Updated: July 17, 2014 23:18 IST2014-07-17T23:15:32+5:302014-07-17T23:18:06+5:30
वेज बोर्ड लागू करण्याची मागणी जोरात

प्रतापगड कामगारांचा आत्मदहनाचा इशारा
कुडाळ : जावळी तालुक्यात एकमेव सहकाराचा आधारवड असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून वेज बोर्ड लागू करण्यासंदर्भात काम बंद आंदोलन करीत आहेत. पावसात भिजत आंदोलन करणाऱ्या या आंदोलनकर्त्या कामगारांचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे.
१६ वर्षांचा भाडेकरार करताना गोडी-गुलाबीने दोन्ही कारखान्यांच्या प्रशासनाने एकमेकांच्या अटी साखर आयुक्तांसमोर मान्य केल्या. मग आता कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करु नये, अशीही मागणी होत आहे.
दिवंगत लालसिंगराव शिंदे यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा. तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची आर्थिक संधी मिळावी, या उद्देशाने प्रतापगड सहकारी साखर कारखाना जावळीत उभा केला. परंतु कर्जबाजारी झाल्यामुळे कारखाना १६ वर्षांसाठी कर्जमुक्त करता यावा, यासाठी किसन वीर साखर कारखान्याने भाडेकराराने चालवण्यास घेतला.
भाडे करारात साखर आयुक्तांसमोर कामगारांना २०१३ चा गाळप हंगामानंतर वेज बोर्ड लागू करण्यासंदर्भाचा लेखी करार होऊनही कामगारांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कामगार पंधरा दिवसांपासून आंदोलनास बसले आहेत.
सोमवारी कारखाना प्रवेद्वारावर किसन वीर-प्रतापगड कामगार आमने-सामने आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष व लालसिंगराव शिंदे यांचे नातू सौरभ शिंदे यांच्यासह कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या उद्देशाने हा सहकाराचा आधारवड जावळीत उभा राहिला. त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींवर कामगारांसाठी ही वेळ आली आहे.
अद्याप किसनवीर कारखाना प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे संबंधिताना घाम गाळणाऱ्या कामगाराना कधी न्याय मिळणार, अशी विचारणाही आंदोलकांनी केला आहे.या आंदोलनामुळे सोनगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तोडग्याच्या प्रतीक्षेत सर्व कामगार आहेत. (प्रतिनिधी)
कारखान्यात घाम गाळून कामगार काम करतो. मात्र, जर कामगारांच्या न्याय मागण्यांकडे किसन वीरने आतापर्यंत दुर्लक्ष केले. व आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. हे सहकार क्षेत्राला शोभनीय नाही. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला किसन वीरने प्रतिसाद न दिल्यामुळे प्रतापगड कामगार आता कुटुंबासह ठिय्या आंदोलन करणार. त्यातूनही मार्ग निघाला नाही तर कामगार सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा प्रतापगड कामगार संघटना अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी दिला आहे.