जनतेच्या सहभागातून परिवर्तन शक्य
By Admin | Updated: July 30, 2014 23:41 IST2014-07-30T23:41:09+5:302014-07-30T23:41:41+5:30
राणी बंग यांचे उद््गार : गडचिरोली जिल्ह्यातील अनुभव ऐकून सातारकर भारावले

जनतेच्या सहभागातून परिवर्तन शक्य
सातारा : मागास आदिवासी स्त्री-पुरुषांचे सहकार्य, आरोग्य सुधारणांना जनतेने दिलेली साथ, विविध आरोग्य योजनांतला सहभाग, यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात समग्र आरोग्य क्रांती आणि व्यसनमुक्तीची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी झाली आणि या प्रकल्पाची नोंद संयुक्त राष्ट्रसंघानेही घेतली. सामान्यांनी मनावर घेतले तर अवघड कामेही सोपी होतात, असे विचार ज्येष्ठ समाजसेविका, ‘शोध’ संस्थेच्या संचालिका डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा स्त्री-आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र तंत्र संघटनेच्यावतीने ‘विजयगाथा गडचिरोलीची’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांच्या आई मनोरमा आणि वडील रसिकलाल शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राणी बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात क्रांती घडविणाऱ्या आरोग्य सुधारणांचा आढावा घेतला.
त्या म्हणाल्या, ‘तीस वर्षांपूर्वी मी आणि डॉ. अभय बंग यांनी गडचिरोलीत रुग्णालय सुरू केले, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला. आदिवासी महिला, पुरुष आणि बालकांच्या समस्यांचा अभ्यास करून आम्ही त्यावर उपाययोजना करताना त्यांच्या मानसिकतेचाही गांभीर्याने अभ्यास केला. साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण, बालविवाह, व्यसनाधीनता, कुपोषण अशा अनेक समस्यांवर मात करताना आदिवासी स्त्री-पुरुषांचेच साह्य मिळाले. आदिवासी समाजात सुईणीचे काम करणाऱ्या महिलेला आमच्या ‘शोध’ संस्थेने प्रसुतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले. गावागावांत पुरुषांना आरोग्यदूत नेमले. अंधश्रध्दा आणि रूढी-परंपरांपासून त्यांची सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न केले.’ (प्रतिनिधी)