...आता गरिबांचीही दिवाळी मेणाची
By Admin | Updated: October 21, 2014 23:46 IST2014-10-21T21:47:48+5:302014-10-21T23:46:25+5:30
दीपोत्सवाची लगबग : परंपरिक दिव्यांंऐवजी मेणाच्या पणत्यांना वाढली मागणी

...आता गरिबांचीही दिवाळी मेणाची
सातारा : दिवाळी हा दिव्यांचा सण. या सणाला अंगणात, दारात लक्षलक्ष दिवे लावून आसमंत उजळला जातो. परंपरिक दिवे बाजारात आलेले तरी तेलाचे वाढलेले आहेत. हे दिवे वाऱ्यामुळे सतत विझतात. त्यामुळे गरिबांच्या घरीही आता मेणाच्या पणत्या पेटलेल्या दिसणार आहेत.
असं म्हटलं जातं, ज्यांच्या घरात निरोगी वातावरण, स्वच्छता, टापटीप असते तेथेच लक्ष्मी असते. त्यामुळेच दिवाळीसणातील लक्ष्मीपुजनादिवशी प्रत्येकजण त्याच्याकडे असलेल्या लक्ष्मीचे पूजन करत असला तरी घरात स्वच्छता राखण्याचे काम करत असलेली खरी लक्ष्मी असलेल्या केरसुणीचे घरोघरी पूजन केले जाते. त्यामुळे केरसुणी खरेदीसाठी सातारा शहरातील बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे.
दिवाळी सण हा पाच दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे असते. त्या-त्या दिवशी पूजा-अर्चा करून शुभेच्छा दिल्या जातात. दिवाळीचा पहिला दिवस असलेला वसूबारस जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी गायीचे पूजन करण्यात आले. पण ज्यांच्याघरी गाय नाही, त्यांनीही दुसऱ्यांच्या घरी जाऊन गायीचे पूजन केले.
दिवाळीतील दुसरा दिवस असलेला धनत्रयोदशीही जिल्ह्यात मंगळवारी साजरी करण्यात आली. यादिवशी पशुधन, मसाल्याच्या पदार्थातील धनाची पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे गुरुवारी लक्ष्मीपूजन आहे.
लक्ष्मीपूजनाला प्रत्येकाच्या घरी त्याच्या-त्याच्या ऐपतीनुसार पूजा करत असतो. त्यादिवशी घरात स्वच्छता करून त्यांच्याकडे असलेल्या धनाची पूजा केली जाते. आपणाकडे लक्ष्मी म्हणून शक्यतो पैशाकडे पाहिले जाते. त्यामुळे लक्ष्मीपुजनाला केवळ पैशाची पूजाच केली पाहिजे असे नाही. हे ओळखून कोण सोने-नाणे, धनदौलतीची पूजा करतो तर कोण पैशांची पूजा करतो.
ग्रामीण भागातून लक्ष्मीची संकल्पना वेगळीच सांगितली जाते. ज्यांच्या घरात स्वच्छता असते, तेथेच लक्ष्मी (पैसा) थांबते असे समजले जाते. आपण राहत असलेल्या घरात शांतता नसेल, सतत आजारपणे, रोगराई असेल तर आपणालाही त्या घरात थांबावे वाटत नाही. समाधान मिळत नाही, अन् चिडचिडेपणा येऊन सतत भांडणे होत असतात.
त्यामुळे घरात स्वच्छता केल्याने प्रसन्न वातावरण निर्माण करत असलेल्या केरसुणीला ‘लक्ष्मी’ म्हणूनच ओळखले जाते. त्यादिवशी प्रत्येकाच्या घरी धन-दौलत, सोने-चांदी किंवा पैशांची पूजा केली जात असली तरी केरसुणीची पूजा ही केलीच जाते. (प्रतिनिधी)
केरसुणी विक्रीतून दहा लाखांची उलाढाल
बंगला, फ्लॅटच्या घरांत बदलत्या काळानुसार गुळगुळीत फरशी आली आहे. त्यामुळे कचराही फारसा होत नाही. आणि वाकून झाडणे गृहिणींना अवघड वाटू लागले. त्यामुळे बंगल्यांमध्ये केरसुणीची जागा आता लांब झाडूने घेतली आहे. पण दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी हवीच म्हणून केवळ या दिवसासाठी केरसुणीला बंगल्यात प्रवेश मिळत आहे. पण काहीही असले तरी यानिमित्ताने केरसुणी तयार करण्याचे काम करत असलेल्या कारागिरांना चांगला व्यावसाय मिळत आहे. त्यातून सुमारे दहा लाखांचा व्यावसाय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.