उत्तर कोरेगावची वसना नदी कोरडीच
By Admin | Updated: August 21, 2014 00:29 IST2014-08-20T22:32:45+5:302014-08-21T00:29:52+5:30
विहिरी आटल्या : पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा

उत्तर कोरेगावची वसना नदी कोरडीच
पिंपोडे बुद्रुक : सोळशी, ता. कोरेगाव येथून हरेश्वर डोंगराच्या पायथ्याला उगम पावलेली वसना नदी उत्तर कोरेगाव तालुक्यातून वाहणारी प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी सोळशीपासून पळशी पर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अपुऱ्या पावसामुळे वसना नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. एकीकडे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असून, पूर्वेकडील तालुक्यातून मात्र पाण्याचा ठणठणाट झालेला दिसून येत आहे.
या परिसराकडे ऐन पावसाळ्यातही पावसाने पाठ फिरविली आहे. मात्र, जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने तुरळक हजेरी लावली. या अपुऱ्या पावसावरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे. मात्र, खरीप हंगाम वाया जाण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. विहिरींच्या पाणीपातळीची अवस्था पावसाळा असूनही डबक्यासारखी झालेली आहे. कूपनलिकांनाही पाणी नाही.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात जुलै महिन्यात मुसळधर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पश्चिमेकडील सर्व नद्या पाण्याने ओसंडून वाहत असताना नेहमीप्रमाणे अनेक गावे संपर्कहीन झाली. धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिमेकडील शेतकरी सुखावला असला तरी पूर्वेकडे मात्र आजही दुष्काळी छाया कायम आहे.
अपुऱ्या पावसावर अवलंबून असलेल्या इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यास आठ महिने वसना नदीला पाणी असते. मात्र, हे पाणी अडविण्याबाबत राज्यकर्ते उदासीन असल्याचे जाणवते. या वसनेच्या राजकारणात इथला शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या पाच वर्षांत वसनेवर केटीवेअर मंजूर झाल्याच्या बातम्या देण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली होती. प्रत्यक्षात मात्र एकच बंधारा बांधला गेला आणि त्याला सोनके व पिंपोडे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने दरवाजे बसविले. यावरूनच नेत्यांचा पाणी अडविण्याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.
ऐन पावसाळ्यात गावांना पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यावरून पाणी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. सत्ताधाऱ्यांसह निवडणुकीच्या मैदानात उतरू पाहणाऱ्यांनी मोफत पाण्याचे राजकारण सुरू करून जनतेच्या भावनेशी खेळण्याचा डाव मांडला आहे. मात्र पाणी समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कुणीही प्रयत्नशील नाही. (वार्ताहर)
योजना अर्धवट का ?वसना उपसा सिंचन योजना गेल्या चौदा वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच आहे. नुकताच उरमोडी, जिहे-कठापूर, वांगना या योजनांसाठी ९० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे मंत्र्यांनी सांगितले. मग वसनेला इतके वर्षांत निधी का मिळत नाही ? फेब्रुवारी २०१४ मध्ये दुसरा टप्पा पूर्ण होण्याचे आश्वासनही हवेतच विरले. आता पुढे काय ? असा उद्विग्न प्रश्न शेतकरी करीत आहेत.