नो पार्किंग नव्हे.. डबल पार्किंग
By Admin | Updated: December 1, 2014 00:16 IST2014-11-30T21:24:55+5:302014-12-01T00:16:26+5:30
वाहन चालकांची शक्कल : रस्त्यामध्येच वाहने लावल्यामुळे वाहतुकीची कोंडी

नो पार्किंग नव्हे.. डबल पार्किंग
सातारा : सातारा शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत आहे. नो पार्किंगमध्ये वाहनांवर कारवाई होत आहे. त्यामुळे आता सातारकरांनी यावर पर्याय म्हणून पार्किंगवर पार्किंग अशी शक्कल लढवून दंडात्मक कारवाईतून सुटका करून घेतली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या मानाने बाजारपेठही वाढली आहेत; परंतु पार्किंगसाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने ही वाहने बाजारपेठेत लावताना नो पार्किंगची धास्ती लागून राहते.
नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने वाहतूक शाखा क्रेनने उचलून दंडात्मक कारवाई करत असते, त्यामुळे या कारवाईतून बचण्यासाठी वाहनधारक ज्या ठिकाणी पार्किंग आहे, त्याच ठिकाणी पार्किंग करत आहेत. मग पूर्वी गाड्यावर गाडी लावली जात होती. त्यामुळे पार्किंगमधून लावलेले वाहन काढतानाही कसरती सुरू झाल्या आहेत. अनेकांना वाहने सरकावतच पार्किंगमधून वाहने काढावी लागत आहेत.
आधीच पार्किंग ठिकाणी जागा मिळणे मुश्किल असते; परंतु सध्या वाहनधारक ‘पार्किंगवर पार्किंग’ म्हणजेच वाहनांपुढे वाहन लावून दंडात्मक कारवाईतून सुटका करून घेत आहेत. त्यामुळे पुढच्या वाहनधारकांची वाहनेही त्याच ठिकाणी अडकून पडतातयेत, याचे कोणाला सोयर ना सुतक.
पोवई नाका, राजवाडा, देवी चौक, खणआळी, शेटे चौक, सीटी पोस्ट आॅफिस या ठिकाणी अधिक वाहने पार्किंग केली जातात. मुख्य बाजारपेठेदिवशी भाजी मंडईतही हीच अवस्था आहे. राजपथावरील अनेक व्यावसायिकांनी पार्किंगची व्यवस्था केली नसून पार्किंग क्षेत्रात अतिक्रमणे केल्यामुळे हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याकडे वेळेवर पालिका व वाहतूक पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
नो पार्किंगवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकारच नाही पाहिजे. पार्किंगची सोय करावी, नंतरच दंड करा. नियम मोडला तरी दंड करा; पण नो पार्किंगमध्ये वाहने लावली तर दंड करण्याची प्रथा मोडली पाहिजे. कारण प्रशासनाने आधी पार्किंगची सोय केली पाहिजे आणि ही त्यांचीच जबाबदारी आहे.
- महेश कारंजकर
वाहतूक ठप्प होते म्हणून वन-वेची संकल्पना अंमलात आणली; परंतु पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. सध्या मुख्य बाजारपेठेत पार्किंगवर पार्किंग लावून निम्मा रस्ता अडविला जात आहे. त्यामुळे याचाही रहदारीवर परिणाम होत असून, याची जबाबदारी मात्र संबंधित प्रशासन घेत नाही.
शहरात अनेक नव्याने इमारती होत आहेत. पालिकेला दिलेल्या प्लॅनमध्ये पार्किंगची सोय दाखविली जाते; परंतु प्रत्यक्ष ती सोय नसल्याने आज वाहने रस्त्यावर दिसत आहेत. मुख्य बाजारपेठेत तर नव्याने अनेकांनी शोरुम पार्किंग क्षेत्रालय उघडले आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
- आमान संदे, वाहनधारक