अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी विद्युत दाहिनीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST2021-06-18T04:26:52+5:302021-06-18T04:26:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा ...

अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी विद्युत दाहिनीची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. लाकडांऐवजी विद्युत दाहिनी अथवा शेणीचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल टिकून राहील. त्यामुळे प्रशासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधूून होत आहे.
जिल्ह्यात रस्ते विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल झाली आणि अजूनही सुरू आहे. या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो वर्षांपासूनची झाडे क्षणार्धात जमीनदोस्त झाली. निश्चित दळणवळण सुधारण्यासाठी रस्ते होणे जेवढे आवश्यक आहे, तेवढाच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण होणे काळाची गरज बनली आहे. रस्ते विकास करताना जेवढी झाडे तोडली तेवढे वृक्षारोपण होणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही.
सध्या घरोघरी गॅस कनेक्शन असल्याने वृक्षतोड काही प्रमाणात थांबली. वडूजमध्ये कोरोना महामारीच्या काळात ३३४ कोरोना बाधितांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी अकरा मण लाकूड व पाच ते सात लीटर डिझेलसाठी सुमारे चार हजार रुपये खर्च येतो. हे प्रमाण पाहता आजवर हजारो टन लाकूड केवळ अंत्यसंस्कारासाठीच वापरण्यात आले आहे. प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल मात्र ढासळत चालला आहे.
अंत्यविधीसाठी इलेक्ट्रिक दाहिनी अथवा शेणीचा वापर व्हावा, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. दुष्काळी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील शेणीच्या माध्यमातून शेतीपूरक जोड व्यवसाय सुरू करता येईल. ‘एकपाटी शेणखताला तर एकपाटी शेणीला’ असा दुहेरी फायदा बळीराजाचा होऊ शकतो आणि प्रसंगी वृक्षतोडही थांबेल. यासाठी मानसिकतेत बदल होणे ही काळाची गरज आहे.
फोटो : १७ केशव जाधव
वडूज येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकूड व डिझेलचा वापर केला जात आहे. (शेखर जाधव )