बाप्पांच्या नावानं हप्तेखोरीला उधाण
By Admin | Updated: August 22, 2014 22:06 IST2014-08-22T21:27:53+5:302014-08-22T22:06:08+5:30
सर्वसामान्यांची लूट : बनावट पावतीपुस्तकांचा वापर

बाप्पांच्या नावानं हप्तेखोरीला उधाण
सातारा : लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी अवघी सातारानगरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. अशा धामधुमीतच बाप्पांच्या नावाखाली हप्ते गोळा करणारी टोळीही सक्रिय झाली आहे. बडे-छोटे व्यापारी, उद्योजकांबरोबरच पथारीवाले, वडापचालकांनाही या सामूहिक हप्तेखोरीचा त्रास होऊ लागला आहे.
काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी व्यापारी बाजारपेठ सजली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी वैविध्यपूर्ण साहित्य, आरास, सजावटीचे साहित्य, दागिने यांसह विविध आकारांतील गणेशमूर्तींचे बाजारपेठेत आगमन झाले आहे.
बहुतांश मोठ्या मंडळांनी तर मंडप उभारणीचीही लगबग सुरू केली आहे. भक्त आणि मंडळाचे कार्यकर्ते एकीकडे जोरदार तयारीला लागले आहेत, तर दुसरीकडे बाप्पांच्या नावाखाली बनावट पावतीपुस्तकांचा वापर करून मनमानी वर्गणी उकळ्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दिसेल त्याच्याकडून मनात येईल तो आकडा सांगून काळी टोळ्या ही हप्तेखोरी करत आहेत. कुठल्याही गणेश मंडळाच्या नावाने छापून घेतलेल्या पावतीपुस्तकांवर नोंदणी किंवा क्रमांकही नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
व्यापारी पेठेतील व्यावसायिक या हप्तेखोरीला कंटाळले आहेत. याविषयी काहीजण आवाज उठवतात तर काहीजण हा त्रास सहन करतात. पुढच्या आठवड्यात येऊ घातलेल्या गणेशोत्सवाआधी साध्या वेशात पोलिसांनी अशा टोळक्यांवर लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. उत्सवकाळातील ही हप्तेखोरी बंद होणे आता आवश्यक झाले आहे. (प्रतिनिधी)
इतरत्र कमानीला परवानगी; साताऱ्यातच बंदी का ?
सातारा : संपूर्ण राज्यात गणेशोत्सवामध्ये कमानीला परवानगी आहे. मात्र साताऱ्यातच बंदी का? असा सवाल गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना भेटून कमानीबाबत चर्चाही करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या स्वागत कमानींना पोलीस अधीक्षकांनी बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. गणेशोत्सव पुर्वीसारखा वर्गणी गोळा करून साजरा केला जात नाही. वर्गणी कोणी देत नाही. त्यामुळे प्रायोजक शोधून मंडळे गणेशोत्सव साजरा करत असतात. जाहीरातीचे फलक लावून त्यामाध्यमातून आर्थिक उलाढाल होते. जेणेकरून गणेशोत्सवामध्ये विविध क्रार्यक्रमाचे आयोजन करता येते. त्यामुळे आम्हाला स्वागत कमान आणि जाहीरात फलकाला परवागनी द्यावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आहे.
लोकांना त्रास व्हावा, अशी आमची भुमिका नाही. रस्त्यावरील जाहीरातीचे फलक रस्त्यापासून दहा फूट उंच असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे शक्य नाही. विसर्जन मिरवणुकीच्या दोन दिवस अगोदर आम्ही शहरातील सर्व स्वागत कमानी काढून घेऊ, असे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे
आहे. (प्रतिनिधी)
उत्सवकाळात देणगी स्वरूपात खंडणी उकळणारे मूठभरच असतील; पण त्यामुळे अवघ्या उत्सवातील भक्त आणि कार्यकर्त्यांचीही बदनामी होत आहे. या मूठभरांना आळा घालून त्यांच्यावर कारवाई होणे असल्याचे मंडळाच्या कार्यककर्त्यांचे म्हणणे आहे.
हप्तेखोरांवर गुन्हे दाखल
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात व्यापारी व उद्योजकांकडून बेलगाम देणगी मागणाऱ्यांविरोधात गेल्या वर्षी शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंद झाले होते. ‘आमच्या भागात काम करताय आणि मदत करत नाही. तुम्हाला दाखवतोच,’ असे सांगून खंडणी मागण्यात आली होती. संबंधित युवकांच्या टोळक्याचा त्रास असह्य झाल्यामुळेच व्यापाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली होती.
१आम्ही ठरवू तो आकडा
गेल्या काही वर्षांत मोठ्या शहरातील नको ती संस्कृती साताऱ्यात बोकाळू लागली आहे. याचेच एक रूप म्हणजे उत्सवकाळातील हप्तेखोरी.
२ काही बहाद्दर तर पावतीवर नाव आणि आकडा टाकून ती पावती व्यापाऱ्यांच्या काऊंटरवर ठेवतात.
३ व्यापाऱ्यांनी केवळ आकडा बघून तेवढी रक्कम कार्यकर्त्यांच्या हाती ठेवणं अपेक्षित असते.
४ जर कोणी व्यापाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला तर त्यांच्याशी हुज्जत घालून अश्लील भाषेत शेरेबाजी करण्यासही ही टोळी कचरत नाही.