बहुलेत ग्रामस्थांनी बांधले तब्बल ४१ बंधारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:01+5:302021-03-23T04:41:01+5:30

मल्हारपेठ : चार वर्षांपूर्वी पाणलोट क्षेत्र विकासासाठी बहुले (ता. पाटण) गावात ४१ बंधारे बांधून पाणी अडविल्याने आजमितीला शिवारात सर्व ...

Most of the villagers built 41 dams! | बहुलेत ग्रामस्थांनी बांधले तब्बल ४१ बंधारे!

बहुलेत ग्रामस्थांनी बांधले तब्बल ४१ बंधारे!

मल्हारपेठ : चार वर्षांपूर्वी पाणलोट क्षेत्र विकासासाठी बहुले (ता. पाटण) गावात ४१ बंधारे बांधून पाणी अडविल्याने आजमितीला शिवारात सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी बहुले येथील शेतकरी राजू पाटील यांच्या धाडसी निर्णयामुळे शिवारातील ओढ्याचे पाणी वाया न घालवता बंधारे अडवून पाणीसाठा केला. बहुले गावच्या शिवारासह शेजारील गावांनाही याचा लाभ झाल्याने चौथ्या वर्षी बारमाही पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांतन समाधान व्यक्त होत आहे. बहुले गावातील शेतकरी राजू पाटील हे आपल्या नऊ एकर शेतीला बारमाही पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ऐन उन्हाळ्यात त्यांना टंचाईस सामोरे जावे लागत होते. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी शेतकरी भरत पानस्कर, अंकुश पानस्कर, राजन पवार, शंकर पवार, दाजी पवार, पांडुरंग डवरी, मानसिंग पानस्कर, भिमराव जरे, भरत पवार यांना एकत्र करून शिवारात वाया जाणारे पाणी ठिकठिकाणी बंधारे बांधून अडविले. पाण्याचा साठा केला. ग्रामस्थांसमवेत लोकसहभागातून मातीचे ४१ बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम त्यांनी आखली. त्याद्वारे बहुले शिवारात ऐतिहासिक चळवळ उभी राहिली. ही चळवळ सध्या चार वर्षे पूर्ण करीत आहे.

शिवारातील पन्नास एकर शेती विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असल्याने येथे विहिरींची संख्या जास्त आहे. अलीकडील काळात विहिरींची पाणी पातळी खाली जात असून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी टंचाई भासू लागली होती. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत होती. बंधारे बांधल्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेचे महत्त्व ग्रामस्थांना पटले असल्याने त्यांनी आपला सहभाग नोंदविला. त्यामळे सुमारे तीनशे एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आली आहे.

- चौकट

इतर गावांनाही झाला लाभ

बहुले गावात बंधारे बांधण्यात आल्याने त्याचा लाभ विभागातील अन्य गावांनाही झाला आहे. शिवारातील गारवडे, पाळेकरवाडी येथील विहिरींना उन्हाळ्यातही पावसाळ्याप्रमाणे पाणी आहे. सध्या बहुले परिसरात बंधाऱ्यात पाणी अडविल्याने सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. हे पाहण्यासाठी अन्य गावांतील शेतकरी व शासकीय अधिकारी भेटी देत आहेत. राजू पाटील यांनी इतर गावांसाठी आदर्श समोर ठेवला आहे.

फोटो : २२केआरडी०३

कॅप्शन : बहुले, ता. पाटण गावात ऐन उन्हाळ्यात बंधारे भरलेले आहेत. त्यामुळे परिसरातील विहिरींमध्येही मुबलक पाणीसाठा आहे. (छाया : सुनील साळुंखे)

Web Title: Most of the villagers built 41 dams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.