सकाळी चालणाऱ्यांना ना तमा पावसाची
By Admin | Updated: August 13, 2014 23:33 IST2014-08-13T22:41:26+5:302014-08-13T23:33:46+5:30
आरोग्य : पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय

सकाळी चालणाऱ्यांना ना तमा पावसाची
सचिन काकडे-सातारा --मनुष्य जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. म्हणून तर ‘चांगले आरोग्य हाच खरा दागिना’ असे म्हटले जाते. उत्तम आरोग्यासाठी चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. म्हणून तर सातारकर उन्हाळा आणि हिवाळ्याबरोबरच पावसाची तमा न बाळगता दररोज पहाटे आणि नित्यनियमाने चालण्याचा व्यायाम करण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत.चालण्यामुळे शरीराच्या बऱ्याच व्याधी दूर होत असतात. मन उत्साही राहते, त्यामुळे डॉक्टरदेखील रुग्णांना चालणाचा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. सातारकरांनी हे महत्त्व ओळखले आहे. त्यामुळे अगदी पहाटेच्या वेळी येथील राजपथ, कर्मवीर पथ, बोगदा, कुरणेश्वर, यवतेश्वर आणि अजिंक्यताऱ्यावर आबालवृद्धांची चालण्याची जणू स्पर्धात सुरू असते. दहा वर्षांपासून ते अगदी ७० वर्षांपर्यंतचे वृद्ध या ठिकाणी दररोज चालताना दिसतात.
येथील शाहू स्टेडियममध्ये सकाळी मुलांबरोबच वृद्धांची गर्दी पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी येणारे व्यक्ती सर्वप्रथम चालण्याचा, पळण्याचा व्यायाम करतात. यानंतर आपल्याला खेळात कार्यमग्न होतात.
गेली काही दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी सातारकर पावसाची तमा न बाळगता अगदी रेनकोट, छत्रीसहित घरातून चालण्यासाठी बाहेर पडत आहे. मुसळधार पावसातही सातारकर आपल्या आरोग्याची काळजी पुरेपूर घेताना दिसत आहेत.
सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यामुळे महिला आरोग्याबाबत किती सजग आहेत, हे यावरून दिसून येत आहे. या महिलांच्या पाठोपाठ युवती ही व्यायामाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शरीराचे स्नायू बळकट करण्याबरोबरच निरोगी राहण्यासाठी चालणे हाच सर्वाेत्तम व्यायाम प्रकार आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी दिवसातून किमान दोन किलोमीटर चालायलाच हवे.
चालणे हा बिनखर्चाचा व्यायाम आहे. चालण्यासाठी कुठल्याही व्यायामशाळेत जावे लागत नाही. अथवा पैसे मोजावे लागत नाही. पहाटे निसर्गाच्या सानिध्यात चालल्याने शरीराला मुबलक प्रमाणात ‘ओझोन’ मिळतो.
चालण्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात. तसेच शरीरात वाढणारी अतिरिक्त चरबीदेखील कमी होते. एवढेच नाही चालण्यामुळे पोटाचा वाढलेला घेर देखील कमी होतो.
चालताना संपूर्ण शरीराची हालचाल होते. त्यामुळे खांदा, हाताचा कोपरा, गुडघा, खुबा या अवयवांची हाडे बळकट होतात. तसेच हाडांची घनता देखील वाढते.
चालण्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते. चालण्यापूर्वी अथवा कोणाताही व्यायाम करण्यापूर्वी एक कप चहा, दूध अथवा दोन बिस्किटे खाल्यास त्यापासून शरीरास ऊर्जा मिळण्यास मदत होते.
चालण्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होतो. तसेच शारीरिक थकवा ही दूर होतो. त्यामुळे काम करण्यात उत्साह वाढतो. गर्भवती महिलांनाही चालणे हा उत्तम व्यायाम असल्याचे डॉक्टर सांगतात.