नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:51+5:302021-03-22T04:35:51+5:30
तळमावले : कुंभारगाव (ता. पाटण) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कुंभारगावसह ...

नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलधारक त्रस्त
तळमावले : कुंभारगाव (ता. पाटण) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कुंभारगावसह मान्याचीवाडी, तळमावले, साईकडे विभाग अनेकदा आऊट ऑफ कव्हरेज होत असल्याने येथील इंटरनेटद्वारे केली जाणारी अनेक कामे खोळंबत आहेत. ढेबेवाडी विभागातील डोंगरी विभाग म्हणून तळमावले परिसराची ओळख आहे. या परिसरातील ग्राहकांना सध्या मोबाईल असूनही वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटअभावी बँकेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यासह इतर कामे करता येणे मुश्किल बनत आहे.
शंकरराव खोत यांचा पुरस्काराने गौरव
कऱ्हाड : वाजेवाडी (ता. कऱ्हाड) येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव खोत यांना महिंद्रा समृद्धी इंडिया अॅग्री अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना परिस्थितीमुळे हा पुरस्कार क्षेत्रीय प्रबंधक अजित बिडकर आणि आशिष गणपुले यांनी खोत यांच्या घरी जाऊन प्रदान केला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व २ लाख ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आले पिकात उल्लेखनीय उत्पादन घेतल्याबद्दल खोत यांची या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली होती.
विंगच्या विद्यालयात आदर्श मातांचा सन्मान
कुसूर : विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयात आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक बी. बी. मोरे, पर्यवेक्षक एस. एस. यादव यांच्या हस्ते जनाबाई डोळे, सुमन आवले आणि स्वाती जाधव यांचा सन्मान करण्यात आला. यू. एस. गलांडे, यू. जे. बिचुकले, दीपाली बामणे, योगेश सनदी, एस. व्ही. सावंत, एन. आर. पाटील, बी. बी. कुंभार, एस. व्ही. जाधव, मनीषा पाटील, डी. जे. निकम, सचिन जाधव, आदी उपस्थित होते.
पिंपरी ते रिसवड रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
मसूर : पिंपरी ते रिसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून, सदरचा रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्त केला नसल्याने दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित रस्ता हा शामगाव घाटातून खाली येवून कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून बनवण्यात आला होता. मात्र, तो उखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
येवती ते पाटीलवाडीचा रस्ता बनला धोकादायक
कऱ्हाड : येवती ते पाटीलवाडी या तीन किलोमीटर अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने ही झाडेझुडपे तोडावीत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. यापूर्वी काही वेळा या झाडाझुडपांमुळे अपघात घडले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.