तांबवे परिसरातील सभासदांना ‘विठ्ठला’ची साद
By Admin | Updated: March 12, 2015 00:10 IST2015-03-11T21:50:16+5:302015-03-12T00:10:56+5:30
विठ्ठलराव जाधव : तुमची गरज नाही म्हणणाऱ्या अध्यक्षांना धडा शिकवा

तांबवे परिसरातील सभासदांना ‘विठ्ठला’ची साद
तांबवे : ‘तांबवे भागात सभासदांची संख्या मोठी आहे. कारखान्याच्या उभारणीतही या भागाने मोठे योगदान दिले आहे. त्यावेळी इतर कारखान्याच्या तुलनेत ऊसदर कमी मिळत असतानाही सभासदांनी त्याचा विचारही केला नाही. आता मात्र मला तांबवे भागातील सभासदांची गरज नाही असे म्हणणाऱ्या विद्यमान अध्यक्षाला मतपेटीतून धडा शिकवा,’ असे अवाहन कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव यांनी केले. तांबवे, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी पॅनेलच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेलचे प्रमुख लालासाहेब यादव, युवा नेते धैर्यशील कदम, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे, बाळासाहेब जाधव, निवासराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. जाधव म्हणाले, ‘तांबवे येथील एका उमेदवाराने आम्हाला फसवले. खरेतर माझ्या घरात येवूनच आमच्या पॅनेलमधूनच अर्ज भरला होता. पण त्यांना दुर्बुध्दी सुचली आज ते खुलासा करत असले तरी सुबुध्दी असणारे मतदार त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. या भागाला गेल्या काही वर्षांपासून ऊसतोडणी टोळी देण्याच्या नियोजनता सापत्न वागणूक मिळत आहे. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या टोळीला सभासद चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.’ धैर्यशील कदम म्हणाले, ‘सह्याद्री कारखान्याचा अध्यक्ष आणि सचिवही घरचाच. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. पंधरा वर्षांत कारखान्यात विस्तारीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला आहे. साधनसामुग्री खरेदीत मोठा घोटाळा आहे. अम्ही सत्तेवर येताच हे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’
मनोज घोरपडे यांनी आमदार फंडातून भागवार ऊस वजन काटे बसवणार असल्याचे अध्यक्ष सांगतायेत असे सांगून त्यांनी काट्यासाठी फंड दिला तर आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देवू असा चिमटा काढला. तसेच आम्ही सत्तेवर येताच कारखाना वाहनतळावर शेतकऱ्यांच्या नियंत्रणामध्ये असणारा ऊस वजनकाटा बसविणार असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)