माऊलींच्या पालखीत पोलिसांचे ‘स्पिकर’वर लक्ष
By Admin | Updated: June 22, 2014 00:20 IST2014-06-22T00:12:00+5:302014-06-22T00:20:08+5:30
आगमनाची प्रतिक्षा : २७ जून ते ३ जुलै पर्यंत जिल्ह्यात मुक्काम

माऊलींच्या पालखीत पोलिसांचे ‘स्पिकर’वर लक्ष
सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी येथून प्रस्थान झाले असून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दि. २७ जून ते ३ जुलै या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.२७ जून रोजी वाल्हे, ता. पुरंदर येथून सकाळी निघणार आहे. सकाळचा विसावा पिंंपरे खुर्द विहिर येथे होणार आहे. दुपारी निरा नदीत श्रीचे स्रान व लोणंद येथे मुक्काम असणार आहे. दि. २८ जून रोजीही पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी असणार आहे. दि. २९ जून रोजी लोणंद येथून चांदोबाचा लिंंबकडे प्रयाण व चांदोबाचा लिंंब येथे उभे रिंगण आणि रात्री तरडगाव, ता. फलटण येथे मुक्काम. दि. ३० जून रोजी तरडगाव येथून प्रयाण करुन दत्तमंदिर, काळज तसेच सुरवडी येथे सकाळाचा विसावा घेत निंंभोरे ओढा येथे दुपारचे भोजन घेऊन वडजल मार्गे फलटणकडे प्रयाण. रात्रीचा मुक्काम फलटण विमानतळ तसेच दुसऱ्या दिवशीही दि. १ जुलै रोजीही फलटण (विमानतळ) येथे सोहळा मुक्कामी असेल.
दि.२ जुलै रोजी पालखी सोहळा फलटण येथून निघून विडणी येथे सकाळचा विसावा घेऊन पिंंपरद येथे दुपारचे भोजन होईल. त्यानंतर निंंबळक फाटा येथे दुपारचा विसावा घेतल्यानंतर पालखी बरड मुक्कामी पोहचेल. बरड येथे रात्रीचा मुक्काम झाल्यानंतर दि. ३ जुलै रोजी सकाळी प्रयाण करुन साधुबुवाचा ओढा येथे सकाळचा विसावा व धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ दुपारचे भोजन होईल. त्यानंतर शिंंगणापूर फाटा (पानसकरवाडी) येथे दुपारचे भोजन घेतल्यानंतर पालखी नातेपुते, जि. सोलापूर येथे मुक्कामी पोहोचेल, असेही डॉ. देशमुख यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
ध्वनी प्रदूषण टाळा- अभिनव देशमख!
सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २६ जुन रोजी जिल्ह्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ‘वारीत लाऊड स्पीकरचा योग्य वापर करून ध्वनी प्रदूषण टाळावे,’ असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
पालखी सोहळ्यात कायदा व व्यवस्था अबाधित रहावा तसेच आरोग्य व वाहतूकी संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक सर्व सूचना दिल्या आहेत. पालखी सोहळ्यात वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या सोहळ्यात ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सोहळा यशस्वीकरण्यासाठी लाऊड स्पीकरचा योग्य प्रकारे वापर करून ध्वनीप्रदूषण टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होणाऱ्या दिंड्या, भाविक व वाहनांची संख्या पाहता पालखी मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण तालुक्यात एसटी गाड्यांमध्ये ३० जुन ते २ आॅगस्त दरम्यान बदल केला असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली आहे.