१३ तास... १६ पोती अन् २ हजार चाैरस फुट जागेवर छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी

By प्रगती पाटील | Updated: April 8, 2024 19:12 IST2024-04-08T19:11:23+5:302024-04-08T19:12:12+5:30

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांना आदरांजली म्हणून राजवाडा चौपाटी गांधी मैदान येथे ही रांगोळी काढण्यात आली.

Maharangoli of Chhatrapati Sambhaji Maharaj on 2 thousand square feet Satara | १३ तास... १६ पोती अन् २ हजार चाैरस फुट जागेवर छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी

१३ तास... १६ पोती अन् २ हजार चाैरस फुट जागेवर छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी

सातारा : फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील रांगोळी कलाकार आकाश दळवी याने चक्क १३ तासात १६ पोती रांगोळींचा वापर करून तब्बल ६० बाय ३६ फुट अर्थात २ हजार चाैरस फुट क्षेत्रात छत्रपती संभाजी महाराज यांची रांगोळी रेखाटली. राजवाडा चाैपाटी येथील ही रांगोळी सातारकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांना आदरांजली म्हणून राजवाडा चौपाटी गांधी मैदान येथे ही रांगोळी काढण्यात आली. औरंगजेबाने फितुरीने संभाजी महाराज याना अटक केली व ४० दिवस त्यांचे अतोनात हाल करून फाल्गुन अमावस्या दिवशी त्यांना मारले जगाच्या इतिहासत एकाद्या राजाला एवढ्या क्रूरपणे मरण्याची ही एकमेव घटना. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने व संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली खेडोपाडी युवक पाळत आहेत.

याचाच भाग म्हणून साताऱ्यातील आकाश दळवी या रांगोळी कलाकाराने रविवारी रात्री ९ वाजता रांगोळी रेखाटायला सुरूवात केली. यासाठी त्याला बबन लोहार आणि साइ थोरात या दोन कलाकारांचीही मदत झाली. रात्री ९ वाजता सुरू झालेले हे रेखाटन तब्बल १३ तास चालले सकाळी ११ वाजता ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. गौंधी मैदानाच्या सोमण व्यासपीठासमोर काढलेली ही महाकाय रांगोळी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.

१. चाळीस दिवसांचा सुतकाचा महिना
धर्मवीर संभाजी महाराज यांचा छळ झाला ते ४० दिवस सुतकाचा महिना म्हणून महाराजांच्या विचारांचा आणि त्यागाच्या महिन्यात युवक गोड खात नाही, पायात चप्पल घालत नाहीत, गादीऐवजी जमिनीवर झोपतात. अशा कृतीतून श्रध्दांजली व बलिदान मास पाळला जातो. धर्मवीर बलिदान मास उभ्या हिंदुस्थानला अंतर्मुख करणारा क्लेशकायक, दुःखदायक मास आहे. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या महिना भरात रोज एकत्र जमून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास याचे श्लोक पठण होत असते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासच्या निमित्ताने त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यंदा राजवाडा गांधी मैदानावर त्यांची भली मोठी रांगोळी साताऱ्यातील कलाकारांनी साकारली. यानिमित्ताने राजांचे कार्य आणि त्यांचा त्याग याची माहिती पुढील पिढीस होण्यास मदत होइल.
- धनंजय खोले

Web Title: Maharangoli of Chhatrapati Sambhaji Maharaj on 2 thousand square feet Satara