‘रामप्रसाद’ हत्तीच्या विरहानं माहुतपुत्र तापानं फणफणला
By Admin | Updated: December 23, 2015 01:14 IST2015-12-23T00:32:12+5:302015-12-23T01:14:18+5:30
‘पाल’नगरीही हळहळली : माहूत जावेद शेख कुटुंबीय दिवसभर रिकाम्या शेडसमोर बसून

‘रामप्रसाद’ हत्तीच्या विरहानं माहुतपुत्र तापानं फणफणला
जगदीश कोष्टी - सातारा -सातारा : अंगाखांद्यावर खेळलो... त्याचे कान, सोंड, शेपूट ओढले तरी त्यानं न चिडता ते गंमतीवर घेतलं... महाकाय प्राणी पण आपल्या त्रासामुळं कधीच चिडला नाही, असा रामप्रसाद रविवारी मथुरेला गेला. त्याच्या विरहाने माहूत जावेद शेखचा पाच वर्षीय मुलगा नवमान तापानं फणफणला आहे.पालच्या खंडोबा देवस्थानच्या हत्तीचे माहुताशी तीन पिढ्यांचे नाते जुळले आहे. जावेद यांना मुलगा नवमान हा पाच वर्षांचा असून, त्याला कळायला लागल्यापासून रामप्रसादचा सवंगडीच बनला आहे. रामप्रसादनेही कधीही मुलांना त्रास दिलेला नाही. त्यांचा एक वर्षाचा मुलगा हत्तींच्या पायाखालीच अनेकदा खेळायचा. त्याला पाहून भाविकही अवाक होऊन जायचे. पण त्याचे हत्ती आणि संबंधित बाळाला कधीच नवल वाटलं नाही. बाळाच्या नखालाही कधी धक्का लागलेला नाही, हे जावेद शेख अभिमानानं सांगतात. मुलंही आठवण काढत आहेत. नवमान ‘रामप्रसाद कोठे गेलाय,’ म्हणून विचारत आहेत. त्याला ‘तो परत येईल,’ असे सांगून समजूत काढत आहेत.
अशी होती जावेदची दिनचर्या
पहाटे उठून शेडमधील झाडलोट करणे
रामप्रसादला आंघोळ घालणे
सकाळी अकरा वाजता त्याला फिरवून आणणे.
त्याला जखम झालेली असल्यास दुपारच्या वेळेत ती स्वच्छ करणे.
सायंकाळी चार वाजता परत फिरवून आणणे.
पंधरा दिवसांतून एकदा त्याची नखे काढणे.
दर रविवार, पौर्णिमेला दिवसभर मंदिर आवारात उभे करणे.
रामप्रसादचा कान फाटल्याचे निमित्त करून त्याला नेले. तेथे नेऊनही जंगलात सोडणार नाहीत. तेथे बांधूनच ठेवणार असतील तर येथे काय अडचण होती. गेल्या वर्षी यात्रेत गर्दीत गोंधळला त्यावेळीही आम्ही केवळ शब्दाने त्याला ‘रामू... शांत होत जा बेटा’ म्हणून शांत केले होते.
- जावेद शेख, माहूत
हत्यारे नेली पण आठवणी नाही दिल्या..
रामप्रसादला नेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी अंकुश घेऊन गेले. ते इतरही साहित्य नेणार होेते. मात्र, शेख कुटुंबीयांनी रामप्रसादच्या आठवणी न देण्याचा चंग बांधला. त्यांनी रामप्रसादची घंटी, झुल, पोटी, कंडा मात्र दिल्या नाहीत. आता या वस्तूच लोकांच्या आठवणी बनल्या आहेत.