स्थानिक नेत्यांनी उद्योजकांच्या अडचणी सोडवाव्यात : अजित पवार
By दीपक देशमुख | Updated: April 9, 2023 17:59 IST2023-04-09T17:59:00+5:302023-04-09T17:59:35+5:30
"सातारा एमआयडीसीत होतकरू उद्योजकांना जागा मिळाव्या"

स्थानिक नेत्यांनी उद्योजकांच्या अडचणी सोडवाव्यात : अजित पवार
सातारा : उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे त्या-त्या भागातील स्थानिक नेत्यांचे कर्तव्य आहे. सातारा शहरानजीक एमआयडीसीमध्ये मोकळे प्लॉट आहेत. पण या ठिकाणी होतकरू नवोद्योजकांना जागा मिळत नाही. स्थानिक नेत्यांनी थोडा दिलदारपणा दाखवून उद्योजकांच्या अडचणी असतील त्या प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.
वाढे फाटा, सातारा येथील देविका मंगल कार्यालयात मराठा बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित मराठा उद्योजक पुरस्कार व पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी शिवाजी द मॅनेजमेंट गुरूचे लेखक नामदेवराव जाधव, मराठा बिझनेस फोरमचे कार्यकारी अध्यक्ष अरुण पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, हेमंत बर्गे, फोरमचे जिल्हाध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष मनोज देशमुख, राजेंद्र सावंत, जगदीश शिर्के, वैशाली निंबाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, मराठा तितुका मेळावा उद्योजक त्यातून घडावा या हेतूने मराठा बिजनेस फोरम कार्यरत असून मराठा उद्योजक घडवण्याचे आव्हानात्मक काम संघटना करत आहे. मराठा समाज एकत्र येत नाही, उद्योगाकडे वळत नाही असे म्हटले जाते. पण सगळ्यांना एकाच फूटपट्टीत मोजणे योग्य नाही अनेक मराठा उद्योजकांनी सातारात नव्हे तर राज्यात देशात तसेच बाहेरील देशातही आपला नावलौकिक केला आहे. यामुळे मराठा समाजही उद्योगात यशस्वी होऊ शकतो याची खात्री बाळगता येईल.
कृती इतकेच बोलणंही महत्त्वाचं
शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक नामदेवराव जाधव यांच्या व्याख्यानातून युवकांना प्रेरणा मिळते. ते नेहमी बोलतात की बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची. पण नामदेवराव व्याख्यानांचेही शुल्क घेतात. त्यामुळे जे जेव्हा बोलताना कृती महत्त्वाची म्हणतील तेव्हा बाेलणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचे युवकांनी सांगावं. अजित पवार यांच्या या कोपरखळीला उपस्थितांसह जाधव यांनीही खळखळून हसत दाद दिली.