‘कास’ आटला; पर्यटकांचा पूर !
By Admin | Updated: June 1, 2015 00:21 IST2015-05-31T22:37:07+5:302015-06-01T00:21:40+5:30
सलग सुट्यांमुळे गर्दी : पर्यटकांनी लुटला पोहण्याचा मनसोक्त आनंद

‘कास’ आटला; पर्यटकांचा पूर !
पेट्री : शहराच्या पश्चिमेस सर्वांचेच आकर्षण असणाऱ्या कास पर्यटनस्थळी सलग सुट्टया व उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे परिसर पर्यटकांनी बहरून गेला आहे. कास तलावावर नुकतेच साकारलेल्या बेटावर पर्यटक मनमुराद आनंद लुटत जणू काही आज कासबरोबर स्वर्गच साकारल्याची आगळी वेगळी पर्वणी पाहावयास मिळत होती.कास तलावात सध्या साडेसात फूट पाणीसाठा शिल्लक असून पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याने सध्या दिवसातून आठ ते दहा वेळा इंजिनद्वारे व धरणावरचे पाणी एकत्रित सोडले जात आहे. कास तलावातील पाणीपातळी खालावल्याने कित्येक ठिकाणी जमिनी उघड्या पडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच कास तलावाला बेटाचे स्वरूप आले होते. सध्या तर तलावात शनिवार, रविवर सुट्टया तसेच उन्हाळी सुट्टीचा हंगाम संपत आल्याने परगावहून आपापल्या पाहुण्यांकडे आलेल्या नातेवाईकांनी कास तलावावर मोठी गर्दी केली होती. तलावावर साकारलेल्या बेटावर पर्यटक आपापल्या वाहनांसमवेत मनमोहक निसर्गाचा आनंद लुटत येथील दृष्य कॅमेऱ्यात टिपत आहेत. या ठिकाणी पर्यटकांनी जलविहाराचा आनंदही लुटला. (वार्ताहर)
२० दिवस पुरेल एवढेच पाणी
कास तलावाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे दिवसातून आठ ते दहा वेळा इंजिनद्वारे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील पाणी तिसऱ्या व्हॉल्व्हवरील संरक्षक जाळीच्या खाली आले आहे. धरणाची पाणीपातळी आठ फुटांवरून कमी होऊन साडे सात फुटांवर आली आहे. केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठी सध्या धरणात शिल्लक आहे. जर मान्सून वेळेवर आला नाही तर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.