कऱ्हाड दक्षिंणेत बाहेरच्यांची लुडबूड अन् स्थानिक अस्वस्थ...
By Admin | Updated: August 27, 2014 23:29 IST2014-08-27T22:17:12+5:302014-08-27T23:29:04+5:30
राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे लक्ष : ‘उत्तरे’त बाळासाहेब...अन् ‘दक्षिणे’त बाळासाहेबांचे बंधू; एकाच घराण्याभोवती ‘कराड’ला जुंपण्याचे राजकारण

कऱ्हाड दक्षिंणेत बाहेरच्यांची लुडबूड अन् स्थानिक अस्वस्थ...
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिंणेत शहरासह १५ गावांचा समावेश झाल्याने उत्तरचे आमदार आता दक्षिणेचेही सारस्थ करण्याचे प्रयत्न करीत आहे़ पण आजवर उत्तरेवर वरचष्मा ठेवणाऱ्या दक्षिणेतील प्रस्थापितांना म्हणे त्यांची ही लुडबूड वाटत असून, आता राजकीय पटलावर नाराजीचे सूरही उमटताना दिसू लागले आहेत़
जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून कऱ्हाडची ओळख आहे़ उत्तर व दक्षिण असे दोन विधानसभा मतदारसंघ या तालुक्याला लाभले आहेत़ तर लोकसभेतही अनेक वर्षे कऱ्हाड हा स्वतंत्र मतदारसंघ राहिला आहे़ त्यामुळे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असणाऱ्या कऱ्हाडला राजकीयदृष्ट्या नेहमीच महत्त्व राहिले आहे़ सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाडचेच असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष कऱ्हाडकडे लागून राहत आहे़
कऱ्हाड उत्तरचे प्रतिनिधीत्व माजी मंत्री शामराव आष्टेकर, पी़ डी़ पाटील यांच्यासह मान्यवरांनी केले, तर बाळासाहेब पाटील सध्या त्याचे नेतृत्व करीत आहेत़ परंतु उत्तरेतील नेत्यांना दक्षिणेतील नेत्यांची नेहमीच मदत झाल्याचे मानले जाते़ उत्तरेवर दक्षिणेच्या नेत्यांचाच वरचष्मा राहिल्याचा आजवरचा इतिहास होता; पण आजच्या बदलत्या राजकीय समीकरणात उत्तरेचे आमदार दक्षिणेवर वरचष्मा ठेवू पाहत आहेत; पण ही बाब दक्षिणेतील प्रस्थापितांना अस्वस्थ करणारी ठरलीय़ शिवाय विधानसभा निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या काही नवख्या इच्छुकांनाही रुचलेली दिसत नाही़ त्यातच या आमदारांनी दक्षिण स्वारीसाठीही घरातलेच नाव पुढे सरकवल्याने नाराजीत भरच पडत चालली आहे म्हणे! मंगळवारीच मुंबईत राष्ट्रवादीच्या तिकीट वाटपाच्या यादीत उत्तरेतून बाळासाहेबांचे नाव निश्चित मानले जात असताना, दक्षिणेत त्यांनी चालवलेला खटाटोप चर्चेचा विषय बनलीय. कऱ्हाड शहर उत्तर मतदार विधानसभा मतदारसंघात असतानाही पाटील गटाला विधानसभेसाठी या शहराने कधीच झुकते माप दिल्याचा इतिहास नाही़ गत नगरपरिषद निवडणुकीत बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्ता मिळवली असली तरी त्याला दक्षिणच्या आमदारांची फूस, त्रिशंकू भागाची मदत तर उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या सहकार्यांची झालरच कारणीभूत मानली जाते़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले प्रचंड मतांनी विजयी झाले खरे; पण बाळासाहेबांची सत्ता असणाऱ्या याच कऱ्हाड शहरात सुमारे तीन हजार मते घड्याळाला कमी मिळाली, हा त्यांच्या राजकीय परिस्थितीचा ताजा अहवाल आहे़ तरीही बारामतीकरांच्या आदेशावरून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा हा त्यांचा एक प्रयत्नच मानला जातो़ (प्रतिनिधी)
कऱ्हाडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव म्हटले तर काँग्रेसचे अन् म्हटले तर राष्ट्रवादीचे़ ते नेहमीच खासगीत पृथ्वीराज चव्हाण आपले नेते असल्याचे सांगतात़ तर आमदार उंडाळकरांंशीही त्याचे चांगले संबंध राहिले आहेत़ पण खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ही त्यांची ओळख आहे़ नगरपालिकेत बाळासाहेबांशी आघाडी करत ते उपनगराध्यक्षही झाले आहेत़ त्यामुळे त्यांना गृहित धरून उद्याच्या राष्ट्रवादी व लोकशाही आघाडीच्या मेळाव्यात निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव आहे़ पण पालिकेत स्वत:ची स्वतंत्र आघाडी असणारे यादव उद्या उपस्थित राहणार का? याबद्दल राजकीय वर्तूळात उत्सुकता आहे़
कऱ्हाड पालिकेच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण विकास आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व आहे़ यापुढच्या काळातही आघाडीचे अस्तित्व स्वतंत्रच ठेवणार आहे़ आगामी विधानसभा निवडणुकीबाबतची भूमिका कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच ठरवण्यात येईल़
राजेंद्र यादव,
उपनगराध्यक्ष कऱ्हाड़