कऱ्हाडला ‘प्रशासकीय’साठी मोठा पल्ला!
By Admin | Updated: June 20, 2014 23:06 IST2014-06-20T23:03:29+5:302014-06-20T23:06:12+5:30
उद्योजकांचीही अपेक्षा : नवीन उद्योगांचे होेऊ शकते आगमन, विमानतळ विस्तारीकरणही ठरु शकेल पूरक

कऱ्हाडला ‘प्रशासकीय’साठी मोठा पल्ला!
कऱ्हाड : कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही मागणी प्रामुख्याने उद्योग जगताकडूनच गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. कऱ्हाड तालुक्यामध्ये सध्या अनेक औद्योगिक प्रकल्प असले तरी त्याला मर्यादा पडत आहेत. अनेकवेळा किरकोळ प्रशासकीय कामांसाठीही उद्योजकांना पन्नास किलोमीटरचा पल्ला पार करुन जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारे शहर असल्यामुळे कऱ्हाडसह आजुबाजुच्या परिसराला खूप महत्व आले आहे. येथील तासवडे एमआयडीसीसह अनेक ठिकाणी लहानमोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. विविध प्रकारच्या सेवा व्यवसायांचेही कऱ्हाड परिसरात मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. परंतु या व्यावसायिकांना अनेकवेळा प्रशासकीय कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा आणि वेळ खर्च होत असतो. यासाठीच येथील औद्योगिक जगताला कऱ्हाडला जिल्ह्याचे ठिकाण बनण्याची प्रतीक्षा आहे.
कऱ्हाडची बाजारपेठ ही पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या बाजारपेठांपैकी एक समजली जाते. परंतु येथील व्यावसायिकांनाही अनेकवेळा प्रशासकीय कामांसाठी साताऱ्याची वारी करावी लागते. कऱ्हाड तालुक्याच्या पूर्व भागात आणखी एका एमआयडीसीचा प्रस्ताव आहे. कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यास या एमआयडीसीचे कामही चांगल्या प्रकारे मार्गी लागू शकते. या एमआयडीसीकडे उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा देण्याचे पाऊल उपयुक्त ठरु शकते. (लोकमत टीम)