‘लक्ष्मी तोट्या’पेक्षाही ‘जयाभाव’चा सुतळी बॉम्ब जोरात!

By Admin | Updated: October 20, 2014 22:34 IST2014-10-20T21:34:47+5:302014-10-20T22:34:18+5:30

माण-खटाव : सर्व अंदाज फोल ठरवत मागील निवडणुकीपेक्षा पाचपट मताधिक्य

'Jaya Prakash' twin bomb blast more than 'Lakshmi tatya' | ‘लक्ष्मी तोट्या’पेक्षाही ‘जयाभाव’चा सुतळी बॉम्ब जोरात!

‘लक्ष्मी तोट्या’पेक्षाही ‘जयाभाव’चा सुतळी बॉम्ब जोरात!

सचिन मंगरूळे -म्हसवड  -म्हसवड : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याचे लक्ष माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले होते. येथील पंचरंगी लढतीत विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी पाचपट मताधिक्याने बाजी मारल्याने येथील स्वाभिमानी जनतेने आश्वासक नेतृत्व विकासकामांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून आले, तर ‘नमो’ लाटेवर स्वार होत महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेखर गोरेंनी लढत देत दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली. गेली ४० वर्षे माणच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ असणाऱ्या सदाशिवराव पोळ यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेचे रणजित देशमुख व अपक्ष अनिल देसाई यांचा करिश्मा अपेक्षेप्रमाणे चालला नाही. माण-खटावमध्ये फक्त जयकुमार यांचीच जादू चालली व पुन्हा एकदा ‘जय हो’चीच लाट असल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
माण विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यामध्ये प्रमुख पंचरंगी लढत झाली. या निवडणुकीत प्रमुख पाच मातब्बर उमेदवारांनी प्रचारात वापरावयाच्या सर्व आयुधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्याने या मतदार संघातील निकालाबाबत छातीठोकपणे कोण निवडणूक जिंकणार? हे राजकीय पंडितांनाही अंदाज वर्तविता येत नव्हता. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते आमच्या नेत्याला इतकी हजार मते पडणार? तितकी हजार मते पडणार? या कार्यकर्त्यांचे आकड्यांची बेरीज केली तर झालेल्या मतदानाच्या दुप्पट होत होती; परंतु सर्व अंदाज फोल ठरवत मागील निवडणुकीतील मताधिक्यापेक्षा पाचपट मताधिक्य मिळवत आमदार जयकुमार गोरे यांनी माण खटावचे मैदान जिंकले.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरपासूनच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली होती. पक्षाच्या तिकिटावर अथवा अपक्ष निवडणूक लढवणारच, असा दृढ निश्चय करीत दोन्ही तालुक्यांतील गावे वाडी-वस्ती पिंजून काढली. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि आघाडीत बिघाडी झाली व महायुती तुटल्यामुळे येथील इच्छुक उमेदवारांना विविध पक्षांचा आश्रय घेत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले.
राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी आमदार जयकुमार गोरेंची पहिल्यांदा निश्चित झाली होती; परंतु घटक पक्ष व राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या उमेदवारीचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांपर्यंत सुरू होता. शेवटच्या एक-दोन दिवसांत उमेदवारीचा घोळ मिटला. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेखर गोरे, राष्ट्रवादीकडून माजी आमदार सदाशिवराव पोळ, शिवसेनेकडून रणजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.
दुसरीकडे गत ४० वर्षे माणच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारे ‘किंगमेकर’ सदाशिवराव पोळ यांना जनतेतून निवडून येऊन किंग होण्याचे स्वप्न याही निवडणुकीत अपूर्णच राहिले. यावेळची शेवटची निवडणूक लढवत असल्याचे भावनिक आवाहन करत मागील ४० वर्षांत केलेल्या विकासकामांवर ते निवडणुकीस सामोरे गेले होते.
पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविताना अनेकांचे अंदाज फोल ठरवत चांगलीच मुसंडी मारली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकत पहिल्या प्रयत्नातच दुसऱ्या क्रमांकाची झेप घेतली. त्यांनी ‘आंधळी पॅटर्न’ जसा आंधळी गणात विकासकामांचा राबविला, तसा ‘आंधळी पॅटर्न’ माण-खटाव तालुक्यांतील प्रत्येक गावात राबविणार तसेच भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षितता हे मुद्दे घेऊन तरुणांना आकर्षित करून त्यांनी या निवडणुकीत चांगलेच रंगतदार चित्र निर्माण केले.
हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजित देशमुख यांनी हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेकडून निवडणूक लढवली. खटाव तालुक्यातील एकमेव उमेदवार असल्याने खटावची अस्मिता म्हणून खटाव तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे चित्र निर्माण झाले होते; परंतु या आशा पूर्णत: फोल ठरल्या. त्यांनी दुष्काळी माण-खटावमध्ये औद्योगिक क्रांती, वाढती बेरोजगारी, पाणीप्रश्न, दहशत हे मुद्दे घेऊन निवडणुकीस सामोरे गेले होते. माणच्या जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारल्याचे तर खटाव तालुक्याने अपेक्षित साथ न दिल्याचे निकालावर स्पष्ट होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सहा महिन्यांपूर्वीपासूनच सुरू केली होती. त्यांनी माण-खटाव तालुका पिंजून काढत निवडणूक लढविणारच पक्ष अथवा पक्षाशिवाय; परंतु त्यांना पक्षाच्या वतीने तिकीट मिळेल, अशी आशा होती. परंतु पक्ष नेतृत्वाने त्यांना डावलून सदाशिवराव पोळ यांना उमेदवारी दिली. त्यांनी आजवर १५ वर्षांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत केलेली जनतेची कामे, लोकांच्यात मिसळणारा नेता, सर्व स्तरातील लोकांच्या सुख दु:खात सामील होऊन आजवर केलेल्या जनतेच्या सेवा व पुढील काळात माण-खटावचा विकास कसा झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन निवडणूक लढविली.
एकूणच या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनी, मसल पॉवर, आक्रमक प्रचार, हायटेक प्रचारयंत्रणा राबविल्यामुळे निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र होते. प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणावर झाली; परंतु अटीतटीच्या लढतीत आमदार जयकुमार गोरे यांनी बाजी मारल्याने जिल्ह्याच्या राजकारणातील दबदबा आ. जयकुमार गोरे यांच्यामुळे कायम राहणार हे स्पष्ट असल्याचे निकालाने दर्शविले आहे.

जिंकल्याचे कारण
मतदार संघातील संपर्क आणि पाणी आणण्याची आश्वासन पूर्ती. आश्वासक नेतृत्व विकास कामांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट दिसले.

Web Title: 'Jaya Prakash' twin bomb blast more than 'Lakshmi tatya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.