'दम' लागतो अतिक्रमण काढायला, आहे का? दारातील रस्ता होत नाही... म्हणे आम्ही नगरसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 10:23 PM2020-03-02T22:23:53+5:302020-03-02T22:25:57+5:30

आज काढतो... उद्या काढतो म्हणून अतिक्रमणांना अभय देणारे शहराचे रखवालदार आपल्याच आशीर्वादाने चालणारी अतिक्रमणे काढायचा दम दाखविणार आहेत का... उगाच धमकी देत आणि गावठी कट्टे दाखवत फिरणाऱ्यांनी विकासासाठी पण अतिक्रमणे काढून आपल्यात दम असल्याचे दाखवून द्यावे

 It takes 'breath' to remove encroachment, is it? | 'दम' लागतो अतिक्रमण काढायला, आहे का? दारातील रस्ता होत नाही... म्हणे आम्ही नगरसेवक

गेल्या आठवड्यात शहरात सुरू झालेली अतिक्रमण मोहीम चार दिवसांतच थांबविण्यात आली. त्यामुळे पुन्हा अतिक्रमणे सुरू झाली आहेत.

Next
ठळक मुद्देप्रत्येक वॉर्डात अतिक्रमणांचा विळखा, कोणाची अतिक्रमणे ? कोण काढणार ?

दीपक शिंदे ।
सातारा : स्वच्छ सर्वेक्षण नावालाच... गल्लोगल्ली घाणीचे साम्राज्य... रस्त्यावरून वाहणारी गटारगंगा, फूटपाथवर अतिक्रमणांचा बसलेला बाजार... आणि म्हणे आम्ही शहर चांगले करायला निघालोय... आहे त्याच ठिकाणी चार कारंजे लावली, बगिचे साफ केले आणि तुंबड्या भरण्यासाठी ओढ्यांची कामे केली की विकास होत नाही. आज काढतो... उद्या काढतो म्हणून अतिक्रमणांना अभय देणारे शहराचे रखवालदार आपल्याच आशीर्वादाने चालणारी अतिक्रमणे काढायचा दम दाखविणार आहेत का... उगाच धमकी देत आणि गावठी कट्टे दाखवत फिरणाऱ्यांनी विकासासाठी पण अतिक्रमणे काढून आपल्यात दम असल्याचे दाखवून द्यावे.

सातारा शहर आणि प्रभागातील विकासकामे करणार म्हणून सर्वसामान्य सातारकरांनी ज्यांच्यावर मेहरबानी केली, त्या नगरसेवकांनी गेल्या तीन वर्षांत कोणती विकासकामे केली, याचा लेखाजोखा मांडण्याची आता वेळ आली आहे. एकमेकांवर कुरघोडी करत केवळ पदे मिळविण्यासाठी भांडणाºया या मेहरबानी केलेल्या नगरसेवकांना वॉर्डातील कचºयाचा प्रश्न सोडविता आलेला नाही. ४० गाड्या येऊन त्याचा कचरा होऊ लागलाय तरीही भाड्याच्या गाड्यांमध्ये कचरा जातोय. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे लोकांनी आता कधीच सोडून दिलंय. म्हणे आता पालिकाच कचरा वेगळा करणार. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या प्लांटमध्ये अजून वैद्यकीय कचरा आणि घरगुती कचरा याच्यातील फरक करणे जमले नाही, त्यांनी आता ओला सुका कधी वेगळा करावा?
शहरातील अतिक्रमणाची मोहीम ही तर आता दिखावा मोहीम झाली आहे. तेरी भी चूप और मेरी भी चूप, असा प्रकार या मोहिमेबाबत झालाय.

दोन दिवस अतिक्रमणे काढायची आणि चार दिवसांनी परत बसवायची. एका बाजूने सुरू झालेली मोहीम पाचशे मीटरसुद्धा जात नाही. पैसे न देणारी अतिक्रमणे काढायची आणि हप्तेवाली तशीच ठेवायची. एकमेकांना हाताशी धरून स्टंटबाजी करायला सांगायचे. आता या सर्वांना लोकं सरावली आहेत. त्यांना सर्व काही माहिती झालंय आपली मेहरबानी कोणावर आहे आणि खफा नजर कोणावर...

सातारा पालिकेला चांगले उत्पन्न मिळेल असे कोणते प्रकल्प सर्वांनी एकत्र येऊन राबविले? असा सवाल आता लोक विचारू लागले आहेत. दरवेळी उदयनराजे आणि राजमाता कल्पनाराजे यांनी येऊन कानउघडणी करायची, मग हे शहाणे झाल्याचे सोंग करणार. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. आम्हाला काम करायची संधीच मिळत नाही, असे अनेकांचे पालुपद...अहो कशाला लागते संधी...संधी तर मिळवायची असते. नगरसेवक म्हणून मिळवली ती काय फक्त मिरवण्यासाठीच मिळवली का... तेव्हा कोण म्हणाले होते चला तुम्हाला संधी देतो. ती मिळवलीच ना... मग आता कशाला संधी पाहिजे ? काम करायला दम लागतो, संधी नाही. तो दाखविण्याची आता वेळ आली आहे. होऊ द्या शहरातील रस्ते मोठे, लोक नावे ठेवतील का रस्ता मोठा झाला म्हणून; पण मानसिकताच बदलायची नाही.
भाजीवाले तुमच्या नाकावर टिच्चून रस्त्यावर बसतायत. त्यांना बाजूला करण्याची हिंमत आहे का तुमच्यात? अनेकदा तुमची गाडीच चौकातून वळताना अडकतीय. तेव्हा म्हणताय घे अजून मध्ये गाडी

...दुसऱ्यांनी काय करायचे?
सगळेच सारखे आहेत, असंपण नाही; पण मग इतरांच्या मागून जाणाºयांनी आपले वेगळेपण कसे जपायचे? का ठामपणे उभे राहत नाही. अधिकाºयांना अतिक्रमण काढायला मदत करत नाही. स्वत: उभे राहून प्रत्येकाने आपापल्या वॉर्डातील अतिक्रमण काढायचा निर्णय घ्या... बघा शहरात एकही अतिक्रमण राहणार नाही.

तुमचे कार्यकर्ते आहेत... त्यांनी टपºया चालवून किती दिवस पोटं भरायची. स्वत: मोठ्या इमारती बांधायच्या. त्या भाड्याने द्यायच्या. त्या इमारतींमध्ये कार्यकर्त्यांना एखादे चांगले कॅन्टीन किंवा व्यवसाय सुरू करून द्या ना...तो आयुष्यभर तुमच्यासाठी काम करत राहील. का...दिसला कार्यकर्ता की म्हणालेच काढ टपरी...बघतो कोण काय करतो ते...याच्यातच मर्दुमकी गाजवायची. असं केल्यावर शहराचा विकास होणार का? जरा विचार करा आणि शहराच्या विकासासाठी आता तरी जागे व्हा. तुम्ही करू शकता पण बघा आपल्याकडून काय होतंय का..?


नगराध्यक्षांनी प्रभाग
भेटी पुन्हा करण्याची गरज

प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगराध्यक्षांनी मागील काही महिन्यांत थेट प्रभाग भेटी दिल्या होत्या; पण लोक आता तेही विसरले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आता पुन्हा या भेटींची गरज निर्माण झाली आहे. शहरातील प्रश्न आणखी गंभीर होण्याअगोदर त्याच्यावर वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


संपर्क कार्यालयांचे काय झाले...?
माजी खासदार उदयनराजे भोसले आणि कल्पनाराजे भोसले यांनी प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात एक संपर्क कार्यालय काढण्यास सांगितले होते. काहींनी सुरू केले; पण बरेचजण लोकांना भेटतसुद्धा नाहीत. ना नगरपालिकेत ना घरी... मग लोकांनी भेटायचे कुठे...काहींची तर पत्नी नगरसेवक आणि स्वत:चीच फुशारकी...त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. बरेच काही बदलण्याच्या अगोदर स्वत:ला बदला...नाहीतर बदल हा कायम चांगलाच असतो. हे करून दाखवायची वेळ लोकांवर येईल.


जरा एकदा
क-हाडला जाऊन या...

स्वच्छ शहर स्पर्धेत राज्यात दोनवेळा पहिले आलेल्या कºहाड शहराने काय केले आहे? याची माहिती घेण्यासाठी कोणताही परदेश दौरा करावा लागणार नाही. ५० किलोमीटरवरील कºहाड शहरात जाऊन या. आपण, कुठे आणि कºहाड कुठं चाललंय, हे दुसऱ्या कोणी सांगायची सुद्धा गरज लागणार नाही. तिथेही अतिक्रमणे होतीच ना; पण तीही हटविली. काही विनंती करून तर काही सांगून, समजावून आणि काही दम देऊन.


 


सदर बझारमध्ये रास्ता रोको
सातारा : नळकनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी सदर बझार येथील महिलांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली भारतमाता चौकात रास्ता रोको आंदोलन आणि प्राधिकरणाचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, या भागात झोपडपट्ट्यांची संख्या अधिक आहे. या परिसरात नवीन पाण्याच्या पाईप कार्यान्वित करताना त्या पाईपला मीटर बसवले
नाहीत.
पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असताना त्याठिकाणी नळकनेक्शन तोडली जात आहेत, ते तत्काळ थांबवण्यात यावे.
सदर बझार विभागाला दरमहा पाणी बिल व मीटर पद्धत बंद करून वार्षिक पाणीपट्टी आकारण्यात यावी. प्रत्येकाच्या बिलातून सत्तर टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम परत करण्यात यावी, पाणी सोडण्याची वेळ एका तासाऐवजी दीड तास करावी, बीव्हीजी बिल्डिंगशेजारी असलेल्या झोपड्यांना मुख्य व्हॉल्व्हमधून नळ कनेक्शन देण्यात यावे, या मागण्यांसाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष शरद गायकवाड यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

Web Title:  It takes 'breath' to remove encroachment, is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.