पावसाळी पिकनिकचा बेत आखताय मग या ठिकाणांना नक्की भेट द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 03:14 PM2018-06-10T15:14:55+5:302018-06-10T15:16:25+5:30

पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा ऋतू. या पावसाची मजा लुटण्यासाठी अनेकजण विकेंडला घराबाहेर पडतात अन् आपल्या आवडीच्या स्थळांना भेटी देतात.

If you plan for a rainy picnic, then definitely visit these places! | पावसाळी पिकनिकचा बेत आखताय मग या ठिकाणांना नक्की भेट द्या !

पावसाळी पिकनिकचा बेत आखताय मग या ठिकाणांना नक्की भेट द्या !

googlenewsNext

सातारा : पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा ऋतू. या पावसाची मजा लुटण्यासाठी अनेकजण विकेंडला घराबाहेर पडतात अन् आपल्या आवडीच्या स्थळांना भेटी देतात. सातारा जिल्ह्यातही मान्सूनचे नुकतेच आगमन झाले असून, ओसाड डोंगरांवर हळूहळू हिरवा शालू पांघरू लागला आहे. सर्वत्र धुक्याची दुलई पसरू लागली आहे. पावसाच्या सरी धबधबे कोसळण्याची चाहूल देऊ लागल्या आहेत. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहे. वीकेंडला जायचं कुठे? हा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर सातारा जिल्ह्यातील ही पर्यटनस्थळे आपली वाट पाहत आहेत.

हुंबरळी (पाटण)
पाटण तालुक्यातील कोयनानगर पासून तीन किलोमीटर  अंतरावर हुंबरळी हे एका उंच टेकाडावर वसलेलं गाव. या ठिकाणाहून आपल्याला हिरव्यागार वनराईत लपलेल्या कोयना जलाशयाचे विहंगमय दृश्य नजरसे पडते. सध्या या ठिकाणी जंगल सफारी बरोबरच कोयना जलाशायात नौकाविहाराची मजा पर्यटकांना लुटता येते. या ठिकाणी राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह (एमटीडीसी) काही खासगी रिसॉटही आहे.  हुंबरळीला जाण्यासाठी सातारा किंवा क-हाड येथून पाटणला यावे लागते. यानंतर पाटणपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयना या गावी यावे लागते. कोयनेपासून ३ किलोमीटर अंतरावर हुंबरळी हे गाव आहे.

तापोळा
महाबळेश्वर तालुक्यात वसलेल्या तापोळा या गावाला मिनी काश्मिर म्हणून ओळखले जाते. तापोळ्याला जाण्यासाठी प्रथम महाबळेश्वरला यावे लागते. या ठिकाणाहून २८ किलोमीटर अंतरावर असलेलं तापोळा हे गाव कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. निळे पाणी, प्रदूषणमुक्त वातावरण असे या परिसराचे वर्णन करता येईल.  याठिकाणी स्वत:च्या कारने जाता येते. तसेच एसटी बसेसची व्यवस्थाही आहे. धुक्याच्या दुलईत आपल्याला या ठिकाणी नौकाविहाराचा आनंद लुटता यतो. लॉँचमध्ये बसूनही जलाशयाची सैर करता येते.

कास
कासचे पठार सातारा शहराच्या पश्चिमेकडे साधारण: २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. जैवविविधतेने नटलेल्या या पठारावर आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात विविध प्रकारची फुले फुलतात. मान्सूनचे आगमन झाल्याने येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडू लागले आहे. सोसाट्याचा वारा अन् अवतीभोवती फिरणा-या गर्द धुक्यातून
वाट काढत पुढे जाण्याचा थरार येथे अनुभवण्यास मिळतो. मात्र, ही मजा अनुभवण्यासाठी आपल्याकडे स्वत:ची कार अथवा दुचाकी असायला हवी. कास मार्गावर राहण्यासाठी हॉटेल व जेवणाचीही उत्तम व्यवस्था आहे.

सज्जनगड/ठोसेघर
सातारा शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर सज्जनगड हा किल्ला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पाय-या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे.   गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. या गडावरून अथांग पसरलेल्या उरमोडी धरणाचे मनोहारी दृश्य
नजरेस पडते. ढग आपल्याचा स्पर्शून जात असल्याचा अनुभव येथे येतो. या ठिकाणी जाण्यासाठी सातारा व राजवाडा बसस्थानकातून एसटी बसेसची सोय असून, सर्व गाड्या गडाच्या पायथ्याशी जातात. सज्जनगड फाट्यापासून पुढे सुमारे ९ किलोमीटर अंतरावर ठोसेघर आहे. या ठिकाणचा धबधबा प्रसिद्ध असून धबधबा प्रवाहीत झाल्यानंतर हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देतात.

टेबललॅँड/पाचगणी
थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीची देशात ओळख आहे. थंड व उत्साहवर्धक हवामानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते त्यामुळे पाचगणीला आरोग्य धाम असे म्हटले जाते. येथे येणा-या पर्यटकांना टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. टेबललॅँड हे आशिया खंडातील सर्वात उंच पठार आहे. सोसाट्याच्या वा-याची अनुभूती अन् कट्यावरून उलट दिशने येणारा पाऊस पहायचा असेल तर टेबललॅँडला
यावे लागते. पुण्याहून येणा-या पर्यटकांना पुणे-बेंगलोर महामार्गावरून वाई मार्गे पाचगणीला यावे लागते. शहरापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर हे पठार आहे. पुण्यापासून अवघ्या १०० किलोमीटर अंतराव पाचगणी हे शहर वसलं आहे. या ठिकाणी घोडागाडीतून पठाराची सैरही करता येते.

Web Title: If you plan for a rainy picnic, then definitely visit these places!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.