माणसं सुधारली, वस्ती मागासलेलीच !

By Admin | Updated: December 25, 2015 23:58 IST2015-12-25T23:11:29+5:302015-12-25T23:58:11+5:30

आरफळ दलित वस्ती: दारिद्र्यरेषेतून वगळल्याने चिंतेत आणखी भर

Humans improved, living was just backward! | माणसं सुधारली, वस्ती मागासलेलीच !

माणसं सुधारली, वस्ती मागासलेलीच !

सुनील साबळे -- शिवथर -सातारा तालुक्यातील बागायती समजलं जाणारं आरफळ गाव. या गावामध्ये दलित व मातंग वस्ती गावाच्या बाहेर १२५ वर्षांपूर्वीपासून आहे. आज या वस्तीमध्ये चार-पाच मुले इंजिनिअर, दोन मुले सैन्य दलात, पाच-सहा शासकीय सेवेत कार्यरत आहेत. मात्र, भौतिक सुविधांअभावी वस्ती मागासलेलीच राहिली.
पूर्वी हे लोक गावामध्येच जमदार वाडा याठिकाणी राहात होते. आता मात्र वस्तीवरील काहींना जमीन नसल्याने आणि अशिक्षितपणामुळे नोकरी अथवा व्यवसाय नव्हता.
आरफळ गावामध्ये दलित समाजातील ५० ते ६० कुटुंबे राहतात. त्यांची लोकसंख्या सरासरी ३०० ते ४०० आहे. १९७१ च्या युद्धात याच वस्तीतील दामू लक्ष्मण माने हे हुतात्मा झाले होते. हळूहळू लोक उदरनिर्वाहासाठी काम करू लागले. ग्रामपंचायत स्थापन झाली; परंतु सात-आठ वर्षे आम्हाला कोणताही लाभ मिळाला नसल्याचे वयस्कर लोकांकडून बोलण्यात आले. आजही या वस्तीतील रस्ते डांबराच्या प्रतीक्षेत आहेत.
काही कालांतराने थोडी-थोडी सुधारणा होऊ लागली. येथील दारिद्र्यरेषेखालचा सर्व्हेही झाला; पण त्याचा लाभ ज्यांना मिळाला पाहिजे, त्यांना न मिळता तो लाभ म्हणे दुसऱ्याच लोकांना मिळत आहे. हा सर्व्हेच चुकीचा झाला, असे लोकांमधून बोलले जातेय. ग्रामसभेतही या समस्यांवषयी मोकळ्याच चर्चा रंगत होत असल्याचे दिसून येत आहे.
आरफळमध्ये अंगणवाडी या वस्तीसाठी आहे. पण जागा नसल्यानं मराठी शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. या दलितवस्तीकडे जाण्यासाठी पूर्वी ओढ्यातून जावे लागत होते. पावसाळ्यात तर गावचा संपर्क तुटला जायचा. सध्या पुलाची सोय आहे; पण देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. पण, या दलित वस्तीमध्ये रस्त्यावर कधी डांबर पडलं नाही.
वस्तीतील ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी पावसाळ्यात मुरुम टाकला जातोय, असेही बोलले जातेय. गेली कित्येक वर्षे याबाबत पाठपुरावा केला सात- आठ प्रस्ताव शासनाकडे पाठविले; परंतु वस्तीकडे बघायला कुणाला वेळच नसल्याचे दिसून येते.


माझे चुलत सासरे युद्धात हुतात्मा झाले. माझे शिक्षण बीए झाले असून, मी अंगणवाडी मदतनीससाठी प्रस्ताव पाठविला होता; पण शासकीय अधिकाऱ्यांनी माझा विचार केला नाही. माझ्या जागेवर दुसऱ्या जातीच्या महिलेला घेतले. आम्ही गरीब आहे म्हणून का? आमच्यावर का अन्याय करताय.
- विजया माने,
महिला ग्रामस्थ


आता आमचा समाज सुधारलाय. आमची पोरंपण शिकल्यात; पण नोकऱ्या नाहीत.
आम्ही उद्योग करावा तर भांडवल नाही. त्यासाठी शासनानं आमच्या मुलांना रोजीरोटीसाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे.
- दगडू माने, माजी जवान

Web Title: Humans improved, living was just backward!