नियम माहीत हाय..पण मजबुरी हाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:36+5:302021-09-05T04:44:36+5:30
सातारा : रस्त्यावर वाहन चालविताना काही नियम असतात. हे बहुदा सगळ्यांनाच माहीत असतात. पण हे नियम माहीत असूनही वाहनचालकांकडून ...

नियम माहीत हाय..पण मजबुरी हाय!
सातारा : रस्त्यावर वाहन चालविताना काही नियम असतात. हे बहुदा सगळ्यांनाच माहीत असतात. पण हे नियम माहीत असूनही वाहनचालकांकडून जेव्हा चूक होते; तेव्हा साहेब नियम माहीत हाय.. पण मजबुरी हाय, अशी उत्तरे पोलिसांना ऐकायला मिळतायत. पण तुमची मजबुरी असली, तरी कायद्याची अंमलबजावणी करणे ही आमची मजबुरी असल्याचे उलट सांगत पोलीसही दंडाची पावती दिल्याशिवाय हटत नाहीत. तरीसुद्धा मजबुरीवाले ट्रीपलसीट प्रवास करतच आहेत.
शहरामध्ये ट्रीपलसीटचे प्रमाण जास्त आहे. याचे कारण लोकांची मानसिकता बदलत नाही. घराबाहेर जात असताना पैसे खर्च होतील, हे एक मुख्य कारण असते. तर दुसरे कारण जवळच जायचंय तर कशाला रिक्षाला पैसे घालवायचे, असे म्हणून मग दुचाकीवर ट्रीपलसीट बसून लपत छपत गल्ली-बोळातून प्रवास केला जातो. पण गल्लीच्या बोळावरच एखादा पोलीस दिसल्यास मग या ट्रीपलसीट चालकाची पाचावर धारण बसते. अनेक कारणे सांगून आपली सुटका करण्याचा हे चालक प्रयत्न करतात. आजारी असल्यामुळे सोडायला चाललोय, जवळच जायचं होतं, अशी कारणे सांगतात; पण पोलीसही पक्के मुरलेले असतात. तत्काळ दुचाकीचा फोटो काढून त्याचे चलनही तयार करतात. यामुळे ट्रीपलसीट असलेल्या दुचाकीस्वाराला काहीच बोलता येत नाही. दंड भरून तो आपली सुटका करून घेतो. अशाप्रकारे शहरामध्ये ट्रीपलसीट दुचाकी चालविणाऱ्यांवर आठ महिन्यांत ८५४ जणांवर कारवाई करण्यात आलीय.
चाैकट : दुचाकी चालकांनो, हे नियम पाळा..
घरातून बाहेर पडताना हेल्मेट घाला
स्वत:जवळ वाहन चालविण्याचा परवाना ठेवावा
ट्रीपलसीट दुचाकीवर कोणालाही बसवू नये
दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलू नये
नो एन्ट्रीतून शाॅर्टकट मारू नये
चाैकट : हे दंड पाहा...मग गाडी चालवा
विना हेल्मेट - ५००
ट्रीपल सीट - २००
वाहन परवाना नसणे- २००
नो एन्ट्री- २००
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे- २००
गाडीची कागदपत्रे जवळ न बाळणे-२००
नो-पार्किंगमध्ये गाडी लावणे- २००
चाैकट : कितीजणांवर झाली कारवाई
जानेवारी - ८३
फेब्रुवारी - ९०
मार्च-४३
एप्रिल-५३
मे-४३
जून-१६५
जुलै - १८४
ऑगस्ट-१९३
पोलिसांकडून हातात दंडाची पावती दिली जाते.
नाईलाजाने म्हणा किंवा मजबुरीनं, वाहन चालकांना नियम तोडावे लागतात. शेवटी कायदा मोडणं हा गुन्हाच आहे.