मागेल त्याला छावणी.. पण कधी?
By Admin | Updated: April 15, 2016 00:42 IST2016-04-14T23:06:01+5:302016-04-15T00:42:27+5:30
पावसाळ्यात देणार काय ?: शेतकऱ्यांचा संतप्त सवाल; १४ गावांच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय नाही..

मागेल त्याला छावणी.. पण कधी?
सागर गुजर--सातारा -लहरी राजा, प्रजा आंधळी...अधांतरी दरबार...उद्धवा अजबं तुझे सरकार...! असं म्हणण्याची वेळ सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावांवर येऊन ठेपली आहे. माण-खटाव तालुक्यांतील १४ गावांनी चारा छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत, हे प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले आहेत; पण मागेल त्याला छावणीची घोषणा करणारे शासन पावसाप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी कोरडी अनुभूती देणारे ठरले आहे.पावसाने पाठ फिरविली, उन्हाळी पाऊसही गायब आहे. त्यातच पावसाळा अजून दोन महिने लांब आहे, त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे. माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण या तालुक्यांसह पश्चिमेकडील वाई, पाटण या तालुक्यांतील काही गावे पाण्यासाठी दाहीदिशा फिरू लागली आहेत. जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हे पाणी लोकांना पिण्यासाठी आहे, पण जनावरांच्या पिण्याचे हाल सुरू आहेत. त्यातच चाऱ्याच्या गंजी संपत आल्या आहेत. पाऊसच नसल्याने हिरवा चाराही उपलब्ध होत नाही, या परिस्थितीमध्ये शासनाने चारा छावण्या सुरू करून दुष्काळी जनतेला दिलासा देणे आवश्यक असताना शासन केवळ घोषणाबाजी करत असल्याचे चित्र समोर येत आहे.
राजवडी, बिजवडी, जाशी, भालवडी, वडगाव, पांगरी, येळेवाडी, मार्डी, पिंगळी बु., अनभुलेवाडी, पाचवड, शेवरी, पळशी, जाधववाडी या १४ गावांमधील शेतकऱ्यांकडे अत्यल्प चारा उरला आहे. या गावांमध्ये पाण्याचेही दुर्भिक्ष आहे. विहिरींचे पाणी तळाला गेले आहे. जिवावर
उदार होऊन लोक विहिरीत
उतरतात.
तळाशी असलेले पाणी खरडून घेऊन ते जनावरांना पाजले जात आहे. आता कुठे एप्रिल महिना सुरू आहे. मे महिना तोंडावर आहे. उन्हाची तीव्रता आणखी वाढून उरलेले पाणीही संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील ३५८ गावे ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीत मोडतात. या गावांमध्येही परिस्थिती बिकट आहे. चारा व पाण्याअभावी पशुधन विकण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. जिल्ह्यातील शंभूखेड, इंजबाब, पर्यंती, हवलदारवाडी, मार्डी, कारखेल, भाटकी, भालवडी, वरकुटे म्हसवड, रांजणी, पांगरी, वावरहिरे, कोळेवाडी, दहिवडी, उकिर्डे, महिमानगड, शिंदी बु., गजवडी, जाधववाडी, बिजवडी, पांगरी, बिदाल, बोडके, तोंडले, पाचवड, मलवडी, वेळेवाडी, वावरहिरे, मोही, जाशी, पळशी, दिवडी, पांढरवाडी, गारवडी, वारुगड, परकंदी, टाकेवाडी, पिंगळी खु., शेवरी, गोंदवले बु., वाघमोडेवाडी, मार्डी, राणंद, वडगाव, शिंगणापूर या गावांसह ४०६ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
शासनाचे केवळ २ टँकर
जिल्ह्यामध्ये ७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यापैकी शासनाच्या मालकीचे केवळ २ टँकर आहेत, उर्वरित टँकर खासगी मालकीचे आहेत. माणमध्ये ५१, खटावमध्ये ६, कोरेगावमध्ये ६, खंडाळ्यात १, फलटणमध्ये ४, वाईत ४, पाटणमध्ये ३ टँकरने पाणीपुरवठा
शासन एका बाजूला मागेल त्याला छावणी देण्याची घोषणा करते, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आदेशच मिळाले नसल्याने केवळ कागदपत्रांची जमवाजमव करत असल्याचे चित्र आहे. विधानसभा अधिवेशनातही मी चारा छावण्यांचा प्रश्न गांभीर्याने मांडला, तेव्हा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावणीला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाही शासन हाताची घडी, तोंडावर बोट घालून बसत असेल तर आम्हाला आमच्या मार्गाने उपाययोजना करावी लागेल.
- जयकुमार गोरे, आमदार