फटाक्यांमुळे घेतला गवताने पेट; साताऱ्यातील चार भिंती परिसरातील घटना
By सचिन काकडे | Updated: November 13, 2023 14:28 IST2023-11-13T14:27:16+5:302023-11-13T14:28:05+5:30
सातारा शहर व परिसरात लक्ष्मीपूजनादिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

फटाक्यांमुळे घेतला गवताने पेट; साताऱ्यातील चार भिंती परिसरातील घटना
सचिन काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : साताऱ्यातील चार भिंती स्मारक परिसरात लक्ष्मीपूजनादिवशी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे डोंगरावरील गवताने पेट घेतला. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले.
सातारा शहर व परिसरात लक्ष्मीपूजनादिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
संपूर्ण शहर याआतषबाजीत उजळून निघाले होते. ही आतषबाजी पाहण्यासाठी सातारकरांनी चार भिंती स्मारक परिसरात तुफान गर्दी केली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या ठिणग्या चार भिंतीच्या डोंगरावर येऊन पडल्या. यानंतर काही क्षणातच डोंगरावरील गवताने पेट घेतला. हवेचा वेग अधिक असल्याने आग वाऱ्यासारखी पसरली. शहरातूनही आगीचे लोट नजरेस पडत होते. तीव्र उतार व अंधार असल्यामुळे आगीवर नियंत्रण आणताना काही तरुणांची दमछाक झाली. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर काही तरुणांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत डोंगरावरील गवत मोठ्या संख्येने जळून खाक झाले. ही आग लागली की लावली? याबाबत घटनास्थळी उलट सुलट चर्चा सुरू होती.