शासकीय कार्यालयासमोरच पाण्याची गळती
By Admin | Updated: January 14, 2015 00:35 IST2015-01-13T21:20:58+5:302015-01-14T00:35:10+5:30
स्थानिक त्रस्त : अधिकारी वर्गानेही घेतली गांधारीची भूमिका

शासकीय कार्यालयासमोरच पाण्याची गळती
सातारा : येथील जिल्हा परिषद ते सदर बझार या परिसरात जागोजागी जलवाहिनीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे या परिसरातच विविध शासकीय कार्यालय व अधिकाऱ्यांची निवास्थाने आहेत तरी सुध्दा या गळतीकडे पाहून देखील अधिकारी वर्गांनी गांधारीची भूमिका घेतली आहे की काय असा पश्नच नागरिकांना पडला आहे.
जिल्हा परिषदेच्या चौकातच दिवसभर पाणी वाहत असते हे पाणी जिल्हा परिषद पासून शासकीय विश्रांतीगृहापर्यंत पोहोचले असून गळती लागलेल्या वाहत्या पाण्यामुळे आता रस्ताही उखडला असून रस्त्यावर मोठी डबकी पडली आहेत. तर अनेक ठिकाणी दलदल माजली आहे. जिल्हा परिषद ते सदरबझार येथील समाज कल्याण कार्यालयापर्यंत ही गळती जागोजागी पाहायला मिळते. याविषयी तक्रारी करूनदेखील कोणतीच दखल घेत नाहीत. त्यामुळे आता तक्रारदारही या गळतीकडे दुर्लक्ष करीत आहे.
दरम्यान, येथील शासकीय कार्यालय व निवास स्थानकाच्या मार्गावरच ही अवस्था आहे. तर दुसरीकडे सातारा विश्रामगृह याच मार्गावर आहे. त्यानुसार सातारा शहर व जिल्ह्याचे प्रशासनाच्या दारीच ही अवस्था असल्याने जिल्ह्याचे चित्र कसे असेल अशी कल्पना काहीजण करीत आहेत. शासकीय विश्रामधाममध्ये सतत आमदार, खासदार, मंत्री व वरिष्ठ अधिकारी येतात. एकीकडे शासनाने पाणी वाचविण्यासाठी विविध माध्यमातून प्रबोधन करायचे, दुष्काळी भागासाठी पाणी देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून आराखडा तयार करायचा, दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणी काटकसरीने वापरण्यासाठी आवाहन करायचे आणि पाच ठिकाणी पाणी गळती लागून हजारो लिटर पाणी वाचा जात असताना पाण्याच्या डबक्यातून वाहने चालवीत जगाला पाण्याची किंमत सांगणाऱ्या या नेतेमंडळी व अधिकाऱ्यांना या गळत्या कधी काढणार, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)
मागील दोन महिन्यापासून या रस्त्यावर विविध ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. जिल्हा परिषद चौक ते सदरबझार येथील तारळकर घरापर्यंत रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत पाण्यासाठी फिरावे लागते. शासनाने गळती काढली तर हजारो लोकांना याचा लाभ होईल.
-गणेश भोसले
रस्ता उखडला
शासकीय विश्रामगृहात नेहमीच मंत्री, अधिकाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता नेहमीच चकाचक असतो; परंतु सध्या लागलेल्या जलवाहिनीच्या गळतीमुळे जागोजागी रस्ता उखडला आहे. तर अनेक ठिकाणी गळती लागलेले पाणी या उखडलेल्या रस्त्यात साचून डबकी झाली आहेत.