पाचगणी : इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीने तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना दुबई येथे अडकलेले भिलार परिसरातील पाच जण १३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी संध्याकाळी मायदेशी सुखरूप परतले. यावेळी कुटुंबीयांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. या संकटाच्या काळात जगाच्या पाठीवर असलेले भारतीयच मदतीला धावून आले, अशी भावना जावळी-महाबळेश्वर बाजार समितीचे राजेंद्र भिलारे यांनी व्यक्त केली.महाबळेश्वर तालुक्यातील भिलार व परिसरातील अश्विन शामराव गावडे, अनुप रोहिदास गावडे, राजेंद्र भिलारे, भानुदास कोंडिबा गावडे आणि वसंत आनंदराव पार्टे हे पाच जण २४ फेब्रुवारी रोजी दुबई येथे गेले होते. सुरुवातीला तेथे परिस्थिती पूर्णपणे सामान्य होती. २८ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची युद्धजन्य हालचाल जाणवली नव्हती. मात्र, आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून इराणकडून दुबईवर हल्ल्यांच्या बातम्या समोर येऊ लागल्या आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.दुबईमध्ये परिस्थिती सामान्य असली तरी भारतातील कुटुंबीयांच्या मनात भीतीचे सावट पसरले होते. घरच्यांकडून सतत फोन येऊ लागले, चौकशी सुरू झाली. भिलारमध्येही त्यांच्या सुरक्षिततेची चर्चा सुरू होती. ५ मार्चनंतर मात्र परिस्थिती काहीशी बदलू लागली आणि दुबई विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग अधिक कठीण बनला.या संकटाच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले. अश्विन गावडे यांचे मित्र सदाशिव मांगले हे ओमानमध्ये वास्तव्यास असल्याने त्यांनी पुढाकार घेतला. ६ मार्च रोजी त्यांनी स्वतःची गाडी पाठवून या पाच जणांना दुबईहून ओमानला सदाशिव यांच्या ओमानी मित्रांनी कॅबचे सारथ्य करत ‘अतिथी देवो भव:’ म्हणत सुखरूप ओमानमध्ये पोहोचवले. तेथे आपल्या घरी त्यांचे आदरातिथ्य केले. त्यानंतर संध्याकाळी खासगी जेटच्या माध्यमातून भारतात परतण्याची व्यवस्था करण्यात आली.युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाच्या तिकिटांचे दर चारपट वाढले होते. तरीही अनेक भारतीयांनी आर्थिक व मानसिक आधार दिला. ‘आम्ही अडकलो आहोत हे समजताच अनेकांनी भेटून धीर दिला. विचारपूस केली आणि मदतीचा हात पुढे केला. परदेशात असताना भारतीय माणूसच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी उभा राहतो याचा अनुभव आम्हाला आला,’ असे राजेंद्र भिलारे यांनी सांगितले.हिलरेंज हायस्कूलच्या तेजस्विनी भिलारे यांच्यासह अनेकांनी संपर्क साधून मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात मोलाचे सहकार्य केले. अखेर शनिवारी संध्याकाळी हे सर्वजण सुखरूप भारतात परतल्याची बातमी समजताच भिलार परिसरात दिलासा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कुटुंबीयांनी त्यांचे अश्रूंनी स्वागत केले आणि युद्धाच्या छायेतून सुरक्षित परतलेल्या आपल्या माणसांना मिठी मारताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. संकटाच्या काळात माणुसकी आणि एकोप्याची ताकद किती मोठी असते, याचा प्रत्यय या घटनेतून पुन्हा एकदा आला.
Web Summary : Five Bhilar residents, stranded in Dubai due to Iran-Israel tensions, safely returned home after 13 anxious days. Omani friends assisted their escape. The residents acknowledged the overwhelming support from fellow Indians during the crisis, highlighting unity in adversity.
Web Summary : ईरान-इजरायल तनाव के कारण दुबई में फंसे भिलार के पांच निवासी 13 दिनों के बाद सुरक्षित घर लौट आए। ओमान के दोस्तों ने उन्हें भागने में मदद की। निवासियों ने संकट के दौरान साथी भारतीयों से मिले भारी समर्थन को स्वीकार किया, जो विपरीत परिस्थितियों में एकता को उजागर करता है।