वनवा लावल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षिकेला १० हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:13+5:302021-03-21T04:39:13+5:30
सातारा : वणवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षिकेला १० हजार रुपये ...

वनवा लावल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षिकेला १० हजार रुपयांचा दंड
सातारा : वणवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षिकेला १० हजार रुपये दंडाची शिक्षा वाई न्यायालयाने शनिवारी सुनावली.
शिवाजी लक्ष्मण पार्टे (रा. वेलंग, ता. वाई) व नलिनी गणेश खरात (रा. शिरगाव, ता. वाई), अशी आरोपींची नावे आहेत. पार्टे हे मुख्याध्यापक, तर खरात शिक्षिका म्हणून काम करतात.
वनाधिकाऱ्य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, रेनावळे येथील राखीव वनक्षेत्रास २६ फेब्रुवारी २०२१ रोजी वणवा लागला होता. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक हा वनवा विझविला होता. शिवाजी पार्टे व नीलिमा खरात यांनी रेनावळे गावातील शाळेजवळ कचरा व कागद पेटवून दिले होते. या कचऱ्यातील कागद व पालापाचोळा वाऱ्याने उडून शेजारच्या मालकी क्षेत्रात पडल्याने तेथील गवताने पेट घेतला. ही आग जवळच्या वनक्षेत्रात पसरली. या आगीत वनक्षेत्रातील २२ हेक्टर वनक्षेत्र जळून शासनाचे ११ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम २६ (१), (ब), (फ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम व प्रभारी वनपाल रत्नकांत सीताराम शिंदे यांनी केला. आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
वन गुन्ह्यातील दोन्ही संशयितांनी वाईचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.आर. माळी यांच्यासमोर गुन्हा कबूल केला. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २० दिवसांची साधी कैद ही शिक्षा सुनावली. आरोपींनी एकूण १० हजार रुपये दंड न्यायालयात भरला. सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.