दुष्काळात मटणाच्या पार्टीला वन्यजीव ‘तरस’ले!
By Admin | Updated: June 24, 2014 01:41 IST2014-06-24T01:33:49+5:302014-06-24T01:41:21+5:30
वरकुटे भागात वावर : विक्रेत्यांनी फेकलेल्या मांसावर डोळा; ग्रामस्थांच्या मात्र जिवाला घोर

दुष्काळात मटणाच्या पार्टीला वन्यजीव ‘तरस’ले!
सिद्धार्थ सरतापे / वरकुटे-मलवडी
माणसारख्या दुष्काळी तालुक्यात कुत्र्यांच्या आणि डुकरांच्या पिलांवर तसेच मेलेल्या लहान-मोठ्या जनावरांवर उपजीविका करणाऱ्या तरसांनी आता मानवी वस्तीच्या जवळच मुक्काम ठोकला आहे. मांसविक्रेत्यांनी बोकड, बकरा, कोंबडी आदींचे फेकून दिलेले पाय, खूर आणि आतडी अशा खाद्यांची तरसांना चटक लागली असून, भेदरलेल्या ग्रामस्थांनी मात्र त्यांना पकडण्यासाठी वनविभागाला साकडे घातले आहे.
वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून तरसांनी धुमाकूळ घातला आहे. मेलेल्या प्राण्यांचे मांस तरसांना अत्यंत प्रिय असते. वरकुटेजवळ असलेला मेरुलिंगाजा डोंगर, त्यातील कडेकपारी आणि निर्मनुष्य ठिकाणे हे तरसांचे वसतिस्थान आहे. कासारखडी भागात असणाऱ्या लहान-मोठ्या टेकड्या आणि सभोवतालची खुरटी झुडपेही त्यांचे आश्रयस्थान बनले आहे. वरकुटे-मलवडीच्या दक्षिणेला अर्ध्या किलोमीटर अंतरावर बेघर वसाहत (इंदिरा आवास घरकुल वसाहत) आहे, तर त्यापलीकडे हाकेच्या अंतरावर माळी लवण भाग आहे. या भागात झाडेझुडपे असून, वनीकरण केले आहे. त्या बाजूला मानवी वस्तीही आहे. जंगली प्राणी पोटाची खळगी भरण्यासाठी गावकुसात आणि गावाच्या आसपास फिरताना दिसतात.
सुरुवातीला अनेक दिवस तरसांचा समूह गावाबाहेर टाकलेल्या कुजक्या मांसावर उपजीविका करीत होता. कालांतराने टाकून दिलेल्या मांसाच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आणि तरसांनाही हे मांस खाण्याची चटक लागली. काही दिवसांपासून तरसांची ही टोळी काही ग्रामस्थांच्या दृष्टीस वारंवार पडत असल्याने गावात तरसांचीच चर्चा सुरू आहे. परिसरातील वरकुटे-मलवडी, शेनवडी, काळचौंडी, जांभूळणी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी, कुरणेवाडी, खरातवाडी आदी गावांतील लोकांमध्येही हीच चर्चाआहे.
रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान ही तरसे ग्रामस्थांच्या नजरेस पडतात. काही दिवसांपूर्वी टाकून दिलेले बोकड आणि कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी आलेल्या तरसांना काही तरुणांनी मध्यंतरी हुसकावून लावले होते. मात्र, मांसाला चटावलेल्या तरसांनी माणसांवरही हल्ला चढविला होता. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास तिघा ग्रामस्थांवर तरसांनी हल्ला केला होता. मोठ्या तरसांची जोडी आणि सात लहान पिले या परिसरात आहेत. रानात शेळ््या-मेंंढ्या घेऊन जाणारे यामुळे धास्तावले आहेत.