हद्दवाढ हाच काँग्रेसचा विकासाचा मुद्दा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 23:53 IST2016-03-18T21:09:00+5:302016-03-18T23:53:22+5:30

वैभवशाली परंपरा टिकविण्याचा प्रयत्न : पक्षाचा झेंडा फडकविणार; अंतर्गत सोयीसुविधेचा होणार प्रचार --कोरेगावचा रणसंग्राम

Extension is the development issue of Congress! | हद्दवाढ हाच काँग्रेसचा विकासाचा मुद्दा !

हद्दवाढ हाच काँग्रेसचा विकासाचा मुद्दा !

साहिल शहा-- कोरेगाव शहर आणि तालुक्याला काँग्रेसची वैभवशाली परंपरा आहे. काँग्रेसच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने ठोस विकासकामे केली आहेत. शहरातील सामान्य जनतेला काँग्रेसचे काम चांगल्या पद्धतीने माहीत आहे. सद्य:स्थितीत काँग्रेसच्याच ताब्यात ग्रामपंचायत होती आणि आता नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीवर देखील काँग्रेसच आपला झेंडा फडकविणार आहे. शास्वत विकास आणि हद्दवाढ हाच मुख्य मुद्दा घेऊन काँग्रेस जनतेसमोर जाणार आहे. ग्रामपंचायतीवर काँग्रेसला मानणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे वर्चस्व पहिल्यापासून राहिले आहे. राज्यात जकात कराची अंमलबजावणी करणारी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली होती. १९७०-८० च्या दशकामध्ये जकात करामुळे ग्रामपंचायतीस मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता झाली आणि त्यातून शहराचा विकास साधला गेला. दिवंगत दत्ताजीराव बर्गे यांच्या दूरदृष्टीतून ग्रामपंचायतीने पाणी योजना, सांडपाणीव्यवस्था, पथदिवे आदी योजना राबविल्या. जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींचे पदाधिकारी कोरेगावला भेटी देऊन ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची माहिती घेत होते. त्यातून त्यांनी अनेक योजना आपल्या पंचायतीत राबविल्या आहेत. डॉ. शालिनीताई पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात कोरेगावच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करून दिली. त्यांच्याच हस्ते नवीन इमारतीचे भूमिपूजन देखील झाले होते. त्यांनी मिशन आणि व्हिजन या दोन गोष्टींचा समन्वय ठेवत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे निर्णयाचे अधिकार दिल्याने सत्तेचे विकेंद्रीकरण झाले होते. जिल्हा परिषद सदस्य दिवंगत संभाजीराव बर्गे यांनी देखील डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शहरात अनेकविध कामे केली. १९९२ ते २००२ या दहा वर्षांच्या काळात ग्रामपंचायतीने विकासाच्या बाबतीत अनेक टप्पे ओलांडले.
कृष्णा-कठापूर पाणीपुरवठा योजना, दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र, मटण मार्केट आदी ठोस कामांबरोबरच बियाणे खरेदीसाठी अनुदान, हृदयविकारासाठी इंजेक्शन अनुदान, अंत्यविधी सहाय्य अनुदान राबविणारी ही ग्रामपंचायत एकमेव आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेमंडळी आणि युवक कार्यकर्ते यांचा मिलाफ साधून कामकाज आजवर करण्यात आले. प्रत्येक वॉर्डामध्ये विकासकामे झाली, त्यामध्ये कसलाही भेदभाव करण्यात आला नाही. शहरांतर्गत रस्ते डांबरीकरण हा सुद्धा त्यावेळी ऐरणीवर आलेला मुद्दा निकाली काढत सर्वच रस्त्यांची सुधारणा करण्यात आली. एकूणच काँग्रेस पक्षाने कोरेगावचा चेहरा-मोहरा यापूर्वीच बदलला आहे.


मलकापूरच्या धर्तीवर कोरेगावचा विकास
जिल्ह्यातील मलकापूर नगरपंचायतीचा काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगल्याप्रकारे विकास साधला आहे. आज देशात मलकापूर नगरपंचायत एक रोल मॉडेल म्हणून उदयास आलेले शहर आहे. त्याच धर्तीवर काँग्रेस पक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कोरेगाव शहराचा कायापालट करणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्राधान्यक्रमाने राबविण्याचा आमचा मानस आहे. जनता सुज्ञ आहे, ती काँग्रेसच्याच पर्यायाने आमच्या पाठीशी ठामपणे आहे, याचा आम्हाला विश्वास आहे.
- किशोर बाचल, माजी उपसभापती, कोरेगाव


राष्ट्रवादीच्या आमदारांकडून विकासकामांबाबत दिशाभूल
कोरेगाव शहरावर आजवर काँग्रेसची सत्ता होती आणि यापुढेही जनतेच्या बळावर ती निश्चितपणे राहील, यात तीळमात्र शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शहरात वर्षभरात केलेल्या कामांपेक्षा काँग्रेस पक्षाने केलेली कामे जास्त आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जनतेची दिशाभूल करत आहेत. काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही केलेली विकासकामे जनतेला चांगल्याप्रकारे माहीत आहेत. जनता सुज्ञ असून, ते पुन्हा एकदा आमच्या पाठीशी राहून नगरपंचायतीवर काँग्रेसचाच झेंडा फडकवतील.
- किरण बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य, कोरेगाव


हद्दवाढ व विकास आराखडा यावर भर राहणार
कोरेगाव शहराचा विकास व्हावा, यासाठी २००३ मध्येच नगरपंचायतीची स्थापना झाली होती. काही तांत्रिक बाबींमुळे ती रद्द झाली. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन ठोस विकासकामे केली. दहा वर्षांच्या काळातील कामे आजही जनतेच्या स्मरणात आहेत. सध्या शहराला भेडसावणारी हद्दवाढ आणि विकास आराखडा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. ते आम्ही घेणार असून, त्याद्वारे निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
- अ‍ॅड. प्रभाकर बर्गे, माजी सरपंच, कोरेगाव


राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच लढाई
काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे नगरपंचायतीची पहिली निवडणूक आम्ही पक्षाच्या चिन्हावरच लढविणार आहोत. आमची लढाई ही राष्ट्रवादीबरोबर आहे. राष्ट्रवादीचा करिष्मा संपत चाललेला आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सामाजिक निष्ठा असलेला आणि लोकशाही मार्गाने वाटचाल करणार आहे.
- अ‍ॅड. जयवंतराव केंजळे,

Web Title: Extension is the development issue of Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.