दुर्गसंमेलन हेच शिवसंस्काराचे केंद्र
By Admin | Updated: November 24, 2015 00:27 IST2015-11-23T22:49:35+5:302015-11-24T00:27:11+5:30
शिवव्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांचे दुर्गसंमेलनात प्रतिपादन

दुर्गसंमेलन हेच शिवसंस्काराचे केंद्र
किल्ले वसंतगड : महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवप्रभूंचे संस्कार आहेत. मात्र आधुनिकीकरणात आपण स्वातंत्र्यवीरांसह शिवरायांचे संस्कारही विसरत असताना दुर्गसंमेलनासारखी चळवळ हीच खरी शिवसंस्काराची केंद्रेच आहेत,’ असे गौरवोद्गार शिवव्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी काढले.दुर्गसंमेलनाचा समारोप तळबीडमधील सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधिस्थळी मोठ्या धडाक्यात पार पडला. यावेळी स्वागताध्यक्ष पांडुरंग बलकवडे, कार्याध्यक्ष आमदार शंभूराज देसाई, निमंत्रक दीपक प्रभावळकर, कार्यवाहक सुदाम गायकवाड, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, चित्रलेखा माने-कदम, सौरभ पाटील, विक्रमसिंंह पाटील, सरपंच संगीता गायकवाड, राजेंद्र मोहिते, जयवंतनाना मोहिते आदी उपस्थित होते. डॉ. शेवडे म्हणाले, ‘हिंंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या काही पिढ्या आधुनिकीकरणामध्ये गुंतल्या आणि मूळ संस्कार विसरले गेले. घरात टीव्हीला जितका वेळ आहे, त्याच्या एक टक्काही शिवसंस्कार होत नाहीत. सामर्थ्यशाली राष्ट्रासाठी आगामी पिढ्यांवर शिवसंस्कार हा एकमेव पर्याय आहे. मात्र अशा कोेणत्याच चळवळी होताना दिसत नाहीत. दुर्गसंमेलनाच्या माध्यमातून होत असलेले कार्य म्हणजेच शिवसंस्कार केंद्र आहे. शिवाजी महाराजांच्या केवळ गोष्टी सांगण्यामध्येच कित्येक वर्षे गेली आहेत. शिवरायांना त्या गोष्टींचे नायक न बनविता त्यांच्या कार्याला मन आणि मेंदूमध्ये बिंंबवल्याशिवाय कोणताच उद्धार अशक्य आहे.’ यावेळी दुर्गसंमेलन समितीच्या वतीने सचिव महेश पाटील, शरद पवार, प्रदीप पाटील यांच्या हस्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
नीलेश ननावरे ठरला ‘सच्चा मावळा’चा मानकरी
दुर्ग संमेलनामध्ये दरवर्षी ‘सच्चा मावळा’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. दुर्गसंवर्धन व शिवकार्यासाठी निरपेक्ष पद्धतीने काम करणाऱ्या युवकांची यात निवड केली जाते. राजमाची-ओगलेवाडी येथील नीलेश ननावरे हा यंदाचा ‘सच्चा मावळा’ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याला नितीन बानुगडे-पाटील, सच्चिदानंद शेवडे, आमदार शंभूराज देसाई यांच्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संमेलनाने केले दोन महत्त्वपूर्ण ठराव
तिसऱ्या संमेलनामध्ये केवळ दोनच महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. राज्य सरकारने दुर्गसंवर्धन समिती नेमली असली तरी समितीला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा व या समितीसोबत प्रत्येक गडकोटांच्या स्थानिक समित्यांना संलग्न करावे, असा ठराव साताऱ्याच्या भास्कर मेहेंदळे यांनी मांडला तर त्याला कोल्हापूरच्या मुकुंद मारुलकर यांनी अनुमोदन दिले. तसेच ‘महाराष्ट्रातील किमान पाच दुर्ग ‘मॉडेल फोर्ट’ म्हणून विकसित करावेत व त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करुन द्यावा, असा ठराव विक्रमसिंंह पाटील यांनी मांडला तर त्याला महेश पाटील यांनी अनुमोदन दिले.