वाहतूक पोलिसांनो, हिरोगिरी करू नका !
By Admin | Updated: June 24, 2014 01:41 IST2014-06-24T01:35:31+5:302014-06-24T01:41:05+5:30
उपअधीक्षकांचा ‘डोस’ : कऱ्हाडात कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर

वाहतूक पोलिसांनो, हिरोगिरी करू नका !
कऱ्हाड : कायदा राबविण्याच्या नावाखाली चौकात उभे राहून सर्वसामान्यांशी उद्धट वर्तन करणाऱ्या काही वाहतूक पोलिसांना सोमवारी उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी चांगलेच खडसावले. ‘चौकात उभे राहून फक्त हिरोगिरी करू नका, तुमच्यासाठी असलेले नियम पाळा,’ अशा शब्दात त्यांनी वाहतूक कर्मचाऱ्यांना सुनावले.
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यासह उपविभागातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची सोमवारी घट्टे यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उत्कृष्ठ काम करणाऱ्यांना प्रोत्साहित केले तर कामचुकारपणा किंवा सामान्यांशी उद्धट वर्तन करणाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.
‘कायदा सर्वांसाठी सारखा असतो. गरीब आणी श्रीमंत असा भेद कायद्यामध्ये नाही. त्यामुळे कायदा राबविताना तो सर्वांसाठी सारखा राबवा. वाहनांवर कारवाई करताना फक्त सामान्यांची वाहने अडवायची, गरिबांना दंड करायचा आणि धनदांडग्यांची वाहने कागदपत्रे न तपासता, कारवाई न करता सोडायची, हे चालणार नाही. जशी गरिबांच्या वाहनांवर कारवाई होते तशीच इतरांवरही करा. वाहतुकीला व नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून त्या ठिकाणी वाहने थांबविणाऱ्यांवर कारवाई करा, कोल्हापूर नाका व उंब्रज येथे सकाळी व सायंकाळी प्रवासी घेण्यासाठी थांबवणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, महामार्गावर कोठेही थांबणारी वाहने, हॉटेलजवळ, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक, खासगी वाहनधारकांची दादागिरी, अनधिकृत थाब्यांवर कारवाई करा,’ असे आदेश घट्टे यांनी दिले. (प्रतिनिधी)