सातारा ‘रिपाइं’तील वाद उफाळला

By Admin | Updated: August 28, 2014 22:20 IST2014-08-28T22:17:28+5:302014-08-28T22:20:59+5:30

अशोक गायकवाडांवर टीका : तपासे गट राजीनामा देणार

The dispute arose in Satara 'RPI' | सातारा ‘रिपाइं’तील वाद उफाळला

सातारा ‘रिपाइं’तील वाद उफाळला

सातारा : लोकसभा निवडणूक निकालानंतर धुमसत असलेला रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाच्या (खा. आठवले गट) जिल्हा कार्यकारिणतील वाद आता शिगेला पोहोचला आहे. जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांच्या समर्थकांनी पक्षाला राम-राम करण्याचा निर्णय घेतला आहे.
खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशारे तपासे आणि जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड असे ‘रिपाइं’चे दोन गट साताऱ्यात कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीत आठवले यांनी साताऱ्यातून गायकवाड यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. निकालानंतर तो आणखी वाढला.
तपासे गटाचे नवनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांच्याकडून किशोर तपासे यांच्यावर लोकसभा निवडणुकीत काम केले नसल्याचा वारंवार आरोप केला आहे. तरीही आम्ही शांत होतो. मात्र, आता अतिरेक झाल्यामुळे आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राजीनामे देणाऱ्यांत ‘रिपाइं’च्या भटक्या विमुक्त जमाती सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ शिंदे, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा वायदंडे, रिपाइंचे कोषाध्यक्ष अण्णा उबाळे, मातंग आघाडीचे मारुती बोराटे, अल्पसंख्याक आघाडीचे फारूख पटनी, नितीन तुपे, मिलींद कांबळे, रवींद्र बाबर, महिला आघाडीच्या रेखा तपासे त्याचबरोबर अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

मी राजीनामे देऊन थकलो..!
लोकसभा निवडणुकीत जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी त्रासाला कंटाळून एकदा नव्हे तर तब्बल दोनवेळा राजीनामा दिला. मात्र, तो खा. आठवले यांनी स्वीकारला नाही. तपासे गटाचे काही पदाधिकारी ओव्हाळ यांच्याकडे आपणही राजीनामा द्यावा, अशी विनंती करण्यासाठी गेले होते. ओव्हाळ यांनी मात्र या साऱ्यांपुढे हसतच ‘मी आता राजीनामा देऊन थकलो आहे. माझा राजीनामा कोणी स्वीकारत नाही.
म्हणून त्यांना दु:ख झाले असेल..!
‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी मात्र, तपासे गटाची खिल्ली उडविली आहे. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत माझे कोणी काम केले नाही, असा आरोप मी कोणावरही केलेला नाही. ज्यांनी काम केले नसेल ते राजीनामे देणार असतील म्हणून मला वाईट वाटण्याचे कारण नाही. मी आरोप केला म्हणून त्यांनी राजीनामे देणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा, असेच मानावे लागेल.’
आठवलेंसमवेत अकलूजला चर्चा
‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले अकलूजच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी तपासे गटाला रात्री नऊ वाजता भेटीसाठी वेळ दिली होती. परिणामी तपासे गटाचे सर्व पदाधिकारी सातारा जिल्ह््यातून रात्री उशिरा अकलूजला रवाना झाले.

Web Title: The dispute arose in Satara 'RPI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.